Deepak Kesarkar News : राज्य सरकार 'शाळेत चला अभियान' राबविणार : दीपक केसरकरांची विधानसभेत घोषणा
Shalet Chala Abhiyan : स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान'
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क :
Maharashtra Assembly Winter Session : राज्यात 3 ते 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkars) यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
केसरकर म्हणाले '' 17 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात 1 हजार ६२४ मुले व 1 हजार 590 मुली असे एकूण 3 हजार 214 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण 365 बालके शाळाबाह्य आढळून आले असून ही सर्व 365 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत.
ठाणे जिल्ह्यात 380 बालके शाळाबाहय आढळून आले असून त्यापैकी 297 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत, रायगडमध्ये 38 बालके शाळाबाहय आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये 928 बालके शाळाबाहय आढळून आली. सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये 71 बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर 94 अशी एकूण 165 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत.
हेही वाचा : Assembly Session News : काय सांगता ! मुंबईतील सरकारी शाळेत एका विद्यार्थ्यांवर १ लाख २ हजार रुपये खर्च
उर्वरीत 763 बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात विशेषत: पालघर, ठाणे आणि बुलढाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल. शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्ती, शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.