काॅपीमुक्त अभियानात त्रुटी ; मुख्याध्यापक संघाकडून राज्य मंडळाच्या बदलाला तीव्र विरोध
शिक्षण विभागाने घेतलेला कॉपीमुक्त अभियान हा उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र, यामध्ये काही अडचणी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा (10th and 12th standard exams) पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने घेतलेला कॉपीमुक्त अभियान (Copy-free campaign) हा उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र, यामध्ये काही अडचणी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने तीव्र निषेध केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पत्राद्वारे यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे.
कॉपीमुक्त अभियानात काही बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक तसेच परीक्षक यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे दिसते. कॉपीमुक्त अभियानाबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या दुसर्या सुचनेत, परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत. त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. परंतु, याबाबत शिक्षकांच्या विविध संघटनांतून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यातील त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिका थ्री लेअर पॅकिंगमध्ये येतात. सर्व सह्या झाल्यावर विद्यार्थ्यांसमोर त्या उघडतात. यावेळी वर्गात किमान पाच सहा शाळांचे विद्यार्थी असतात. वर्गावर उपकेंद्र संचालक आणि केंद्र संचालक यांच्या एकूण चार-पाच फेऱ्या होतात. पेपर लेखन पूर्णपणे सर्व वर्गासमोर व्यवस्थित होत असताना शिक्षकांवर हा अविश्वास दाखवणे आवश्यक आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पेपरच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षक पेपरच्या दिवशी शाळेत जे अध्यापन करतात ते करणे शक्य होणार नाही. शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करता पेपरच्या दिवशी शाळा चालविणे अवघड होईल. त्यामुळे बोर्डाने कॉपी मुक्त अभियानासाठी इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
केंद्रसंचालक, पर्यवेक्षक दुसर्या शाळेत जाऊन तेथील यंत्रणा माहिती होणे किंवा तेवढे सहकार्य असणारी व्यक्ती तेथे असू शकणार नाही. त्यामुळे परीक्षेत एखाद्या शैक्षणिक प्रसंगात गरज वाटल्यास त्वरित पूर्तता होणार नाही. कॉपीमुक्त अभियान उत्कृष्टपणे राबवण्यात येईल. परंतु, संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना यांना विश्वासात न घेता केंद्र संचालक पर्यवेक्षक यंत्रणा अदलाबदल करणे योग्य नाही. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी त्या त्या मुख्याध्यापकांना त्याच नियुक्त्या द्याव्यात, अशा मागणीचे पत्र मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षण मंडळाला दिले आहे.