शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा रौप्य महोत्सव उत्साहात
या सोहळ्यात SGIच्या २५ वर्षांच्या वाटचालीवर आधारित ‘Odyssey – An Aspiring Educational Journey’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुण आणि पदवी मिळविण्यावर भर न देता ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि चांगले चारित्र्य विकसित करण्याचे आवाहन केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (SGI), पुणे या संस्थेचा २५ वा वर्धापन दिन अर्थात रौप्य महोत्सव बाणेर येथील बुनतारा भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. बलराम शर्मा, डॉ. शशिबाला शर्मा तसेच मान्यवर अतिथी बी. एल. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सन २००१ पासूनच्या संस्थेच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा यावेळी आढावा घेण्यात आला. SGIच्या प्रगतीमध्ये योगदान देणारे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेसोबत २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘बेस्ट एम्प्लॉयी अवॉर्ड’, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य व गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल कौतुकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रेस्टिज पब्लिक स्कूल (SSC)च्या प्राचार्या श्रीमती मलिका भटनागर यांना ‘एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. सन २००१ पासून SGIसोबत त्यांनी दिलेल्या प्रदीर्घ योगदानाची विशेष दखल घेण्यात आली.
SGIसोबत २००१ पासून मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले डॉ. एम. आर. पाटकर यांनाही त्यांच्या दीर्घकालीन मार्गदर्शनाबद्दल ‘डिस्टिंग्विश्ड मेंटर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. ते सध्या SGIमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
या सोहळ्यात SGIच्या २५ वर्षांच्या वाटचालीवर आधारित ‘Odyssey – An Aspiring Educational Journey’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुण आणि पदवी मिळविण्यावर भर न देता ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि चांगले चारित्र्य विकसित करण्याचे आवाहन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला रंगत आणली. संस्थेच्या २५ वर्षांच्या गौरवशाली शैक्षणिक वाटचालीचा उत्साहात गौरव करताना भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास, नवोन्मेष आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.