रंजना चव्हाण यांना भारती विद्यापीठाची पीएच.डी. पदवी

फळे, भाज्या, फळभाज्या तसेच विविध पिकांच्या संरक्षणासाठी पायरिथ्रॉइड गटातील कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या कीटकनाशकांचा पर्यावरणातील जीवसृष्टीवर घातक परिणाम होण्याची शक्यता असते.

रंजना चव्हाण यांना भारती विद्यापीठाची पीएच.डी. पदवी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. सौ. रंजना शिरीष चव्हाण यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी पायरिथ्रॉइड गटातील काही कीटकनाशकांचे नैसर्गिक प्रोबायोटिक जीवाणूंकडून होणाऱ्या जैवविघटन प्रक्रियेचा अभ्यास करून विद्यापीठाकडे संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधनासाठी सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा. डॉ. गजानन माळी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

फळे, भाज्या, फळभाज्या तसेच विविध पिकांच्या संरक्षणासाठी पायरिथ्रॉइड गटातील कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या कीटकनाशकांचा पर्यावरणातील जीवसृष्टीवर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच कीटकनाशकांचे अवशेष अन्नपदार्थांमध्ये राहून त्याचा परिणाम मानव तसेच इतर प्राण्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

प्रा. चव्हाण यांच्या संशोधनातून मानवी आरोग्यास उपयुक्त असलेल्या प्रोबायोटिक जीवाणूंच्या माध्यमातून या कीटकनाशकांचे जैवविघटन होऊन त्यांचे घातक परिणाम कमी करता येऊ शकतात, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जमिनीतील तसेच अन्न व अन्नपदार्थांमधील कीटकनाशकांचे अवशेष आणि त्यांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी या प्रोबायोटिक जीवाणूंचा उपयोग होऊ शकतो. पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

प्रा. सौ. रंजना चव्हाण यांच्या या शैक्षणिक व संशोधनातील यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एलानबंग सिंग तसेच विद्यापीठ व महाविद्यालयातील पदाधिकारी, प्राध्यापक आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.