मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय; अपार आयडीशिवाय हॉलतिकीट मिळणार नाही

मुंबई विद्यापीठाने आगामी परीक्षांसाठी हॉलतिकीट तयार करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळण्यासाठी अपार आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. अपार आयडीशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याचे हॉलतिकीट तयार होणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय; अपार आयडीशिवाय हॉलतिकीट मिळणार नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठाने आगामी परीक्षांसाठी हॉलतिकीट  (University of Mumbai Hall Ticket) तयार करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळण्यासाठी अपार आयडी अनिवार्य  (APAAR ID Mandatory) करण्यात आला आहे. अपार आयडीशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याचे हॉलतिकीट तयार होणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार केलेला नाही किंवा अपार आयडी, एबीसी आयडी लिंकिंग (ABC ID Linking) आणि आधार प्रमाणीकरणासंबंधी अडचणी येत आहेत, त्यांनी या समस्यांचे तातडीने निराकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अपार आयडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी, क्रेडिट्स (Academic Records Credits)  आणि परीक्षा प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या निर्णयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

या अडचणी दूर करण्यासाठी विद्यापीठाने विशेष सुविधा शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर १९ आणि २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या समन्वयाने हे शिबिर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थी या शिबिरात उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवू शकतील.

शिबिरामध्ये अपार आयडी तयार करणे, अपार आयडी आणि शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) आयडी यांची लिंकिंग करणे, आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करणे या बाबींचा समावेश आहे. तसेच आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकातील तफावत, नाव किंवा जन्मतारखेतील फरक आणि आधारशी संबंधित इतर समस्यांचे निराकरणही येथे केले जाणार आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे विद्यापीठाने सांगितले आहे.

अपार आयडी प्रणालीमुळे शैक्षणिक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करून हॉलतिकीट मिळवण्याची तयारी करावी. विशेष शिबिराचा लाभ घेऊन अडचणी दूर केल्यास परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करता येईल. विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.