होस्टेलमधून रात्री उशीरा तीन विद्यार्थिनींना बाहेर काढले;प्रशासनाने केवळ समज देऊन सोडून दिले
वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत फोनवरून संवाद झाला तरी पूर्वीपासून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीकडून तीन विद्यार्थिनींना रूमबाहेर काढण्यात आले. या सर्व मानसिक व शारीरिक त्रासामुळे एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. तिला रात्री उशिरा विद्यापीठाच्या हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना समोर आली. एका विद्यार्थिनीने दमदाटी करून आपल्या रूम मधून तीन विद्यार्थिनींना रात्री उशिरा रूम बाहेर काढले. त्यामुळे वसतिगृहातील प्रशासकीय कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी एका रूममध्ये राहण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित विद्यार्थिनी रूममध्ये राहण्यास गेल्या. परंतु, पूर्वीपासून रूममध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याने याबाबत आक्षेप घेतला आणि मुलींना रूम बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी विद्यार्थिनींमध्ये शाब्दिक चकमक झाली. वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत फोनवरून संवाद झाला तरी पूर्वीपासून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीकडून तीन विद्यार्थिनींना रूमबाहेर काढण्यात आले. या सर्व मानसिक व शारीरिक त्रासामुळे एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. तिला रात्री उशिरा विद्यापीठाच्या हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यासर्व प्रकरणावरून तीन विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार अर्ज लिहिला होता.त्यात घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला.तसेच या अर्जात रॅगिंग या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर वसतीगृहात राहणायासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याची योग्य व्यवस्था ठेवली जाते किंवा नाही, याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या रूममध्ये राहण्यावरून विद्यार्थिनींमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी तेथे वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र विद्यार्थिनींना रूम बाहेर सामान घेऊन बाहेर काढले जाते. त्या वस्तीगृहाच्या प्रवेशद्वारा जवळ येऊन उभ्या राहतात. तोपर्यंत विद्यापीठाचे वसतिगृह प्रशासन काय करत होते? असा प्रश्न निर्माण होतो?त्यामुळे यासर्व बाबी गंभीरपणे घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी मुलींच्या वसतीगृहात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या होत्या.त्यावरूनही विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले होते.
दरम्यान, बुधवारी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून संबंधित विद्यार्थ्यांची वासतीगृहाच्या इतर खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच वाद घालणाऱ्या मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले. असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.