प्राध्यापक भरती : तीन दिवसांत २ हजार ९०० जणांच्या मुलाखती घेतल्याचा धक्कादायक प्रकार
उच्च शिक्षणमंत्र्यांच्या नावाचा वापर करून काही अधिकाऱ्यांकडून संस्थांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
Professor Recruitment : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी सुमारे २ हजार ९०० उमेदवारांनी अर्ज केले होते. या सर्वांच्या मुलाखती तीन दिवसांत पूर्ण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे उच्च शिक्षण विभागातील (Higher Education Department) केवळ एकाच अधिकाऱ्याने दररोज ९०० हून अधिक मुलाखती घेतल्याची तक्रार महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने (Maharashtra Navpradhyapak Sanghtana) केली आहे. या भरतीत गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणीही संघटनेने मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्यात सध्या सहायक प्राध्यापकांच्या २ हजार ८८ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये उच्च शिक्षणमंत्र्यांच्या नावाचा वापर करून काही अधिकाऱ्यांकडून संस्थांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असून शिक्षण संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या उमेदवारांना डावलेले जात असल्याचा दावाही संघटनेने निवेदनात केला आहे.तसेच इतरही मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या –
- काही अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या सचिवांचे नाव सांगून स्वतचे उमेदवार भरती केले, याची चौकशी करावी.
- अहमदनगरमधील संस्थेत दिवसाला ९०० जणांच्या मुलाखती कशा घेतल्या गेल्या,या प्रकरणाची चौकशी करून यात दोषी अससणा-या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे.
- अनुकंपा, एनओसीच्या फाईल्सवर निर्णय होत नसल्याने चौकशी करावी.
- सहसंचालक कार्यालयांमध्ये वेतन देयक मान्यतेसाठी पैशांची मागणी होत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.