आणखी एक महत्त्वाची परीक्षा रद्द! परीक्षेच्या काही तास आधीच प्रश्नपत्रिका चोरीला..

स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी’ विभागातील दुसऱ्या वर्षाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर विषयाची परीक्षा नियोजित होती. मात्र, परीक्षेच्या आदल्या रात्री अज्ञात चोरट्याने परीक्षा केंद्राची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि ९ सीलबंद प्रश्नपत्रिका पाकिटे चोरून नेली.

आणखी एक महत्त्वाची परीक्षा रद्द! परीक्षेच्या काही तास आधीच प्रश्नपत्रिका चोरीला..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेशातील राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालयामध्ये (RGPV) परीक्षेच्या काही तास आधी प्रश्नपत्रिका चोरी (Theft of the question paper) झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यामुळे विद्यापीठाला पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एक महत्त्वाची परीक्षा तातडीने रद्द (Examination cancelled) करावी लागली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला असून, विद्यापीठाच्या परीक्षा आणि सुरक्षा व्यवस्थेसोबत देशाच्या एकूणच शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

‘स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी’ विभागातील दुसऱ्या वर्षाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर विषयाची परीक्षा नियोजित होती. मात्र, परीक्षेच्या आदल्या रात्री अज्ञात चोरट्याने परीक्षा केंद्राची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि ९ सीलबंद प्रश्नपत्रिका पाकिटे चोरून नेली. सकाळी अधिकारी पोहोचल्यावर खिडकी तुटलेली आणि साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी ही घटना उघडकीस आल्याने प्रशासनाने तातडीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

विद्यापीठाचे कुलगुरू आलोक शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी ‘स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी’च्या संचालिका अर्चना तिवारी आणि पदव्युत्तर परीक्षा नियंत्रक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कुलगुरूंनी स्पष्ट म्हटले की, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आणि सुरक्षा राखणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. या घटनेमुळे विद्यापीठाच्या संपूर्ण परीक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांनी तीन दिवसांत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कुलगुरू शर्मा यांनी या घटनेला पूर्वनियोजित कट म्हणून संबोधले आहे. विद्यापीठाला बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली आहे.

या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा साहित्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. रद्द झालेली परीक्षा लवकरात लवकर नवीन तारखेला घेण्यात येईल, असे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना आणि परीक्षा तयारीवर झालेला परिणाम यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.