शाळेच्या बसचा भीषण अपघात! २३ विद्यार्थी जखमी, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप

शाळेचा नियमित बसचालक वारीवर गेल्याने दुसऱ्या चालकाची नियुक्ती करण्यात आली होती. बस क्रमांक एमएच-१२ पीक्यू-५१२० ही विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे येत असताना चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पलटी झाली.

शाळेच्या बसचा भीषण अपघात! २३ विद्यार्थी जखमी, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूर तालुक्यातील रचनावाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या (Ahilyadevi Holkar Vidyalaya) शाळेच्या बसला बुधवारी सकाळी महांडोळ मार्गावर मोठा अपघात (School bus accident) झाला. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाल्याने बसमधील २३ विद्यार्थी जखमी (23 students injured) झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप (Serious allegation of negligence) केला आहे. 
प्राथमिक माहितीनुसार, शाळेचा नियमित बसचालक वारीवर गेल्याने दुसऱ्या चालकाची नियुक्ती करण्यात आली होती. बस क्रमांक एमएच-१२ पीक्यू-५१२० ही विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे येत असताना चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पलटी झाली. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नव्या चालकाची पडताळणी करण्यात आली होती का, शालेय बसमध्ये शिक्षक किंवा जबाबदार कर्मचारी उपस्थित होता का, वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, यासह अनेक मुद्द्यांवर पालक संतापले आहेत. पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, शालेय वाहतुकीतील सुरक्षितता व्यवस्थेच्या त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. पालक आणि नागरिकांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.