अकरावी प्रवेशासाठी दहाच पसंतीक्रम; 100 रुपये प्रवेश शुल्क,11 ऑगस्टपासून कॉलेज सुरू 

प्रत्येक विद्यार्थ्याकडून नोंदणी शुल्क म्हणून 100 रुपये शुल्क आकारले जाणार असून विद्यार्थ्याला आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी कमीत कमी एक व जास्तीत जास्त दहा पसंतीक्रम ऑनलाइन प्रक्रियेमध्ये नोंदवता येणार आहेत.

अकरावी प्रवेशासाठी दहाच पसंतीक्रम; 100 रुपये प्रवेश शुल्क,11 ऑगस्टपासून कॉलेज सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचा प्रवेश (Class 11th admission)ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार असून त्यासाठी राज्य शासनातर्फे स्वतंत्र नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून नोंदणी शुल्क (Registration fee)म्हणून 100 रुपये शुल्क आकारले जाणार असून विद्यार्थ्याला आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी कमीत कमी एक व जास्तीत जास्त दहा पसंतीक्रम (ten preference order)ऑनलाइन प्रक्रियेमध्ये नोंदवता येणार आहेत. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना शासनाचे नियम डावलून एकही प्रवेश ऑफलाइन पद्धतीने करता येणार नाही.

पुणे मुंबई यासह राज्यातील काही मोठ्या महानगरपालिकांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती. मात्र चालू शैक्षणिक वर्षापासून राज्य शासनाने प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावीचा प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केले असून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा व तालुका निहाय कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात आली आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जात वैयक्तिक माहिती भरता येते. त्यानंतर विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भारतात.

अकरावी प्रवेशासाठी ही कागदपत्र काढली का ? ऑनलाईन प्रवेशासाठी आवश्यक

विद्यार्थ्यांनी द्यावयाचा पसंतीक्रम, प्रवेश रद्द करणे, प्रवेश न घेतल्यास प्रतिबंधित करणे या संदर्भातील कार्यपद्धती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे प्रसिद्ध केली आहे.

 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाकरिता प्राधान्य क्रम भरताना किमान १ प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल व कमाल १० पसंतीक्रम भरता येतील. प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या फेरी पर्यंत दुसरी/तिसरी व चौथी फेरी मध्ये सहभागी होता येणार नाही. नियमित फेरीमध्ये प्रथम प्राधान्यक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात जागा मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असेल. प्रथम प्राधान्यक्रम असलेले शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी जागा मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. सदर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेतील नियमित फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाईल. मात्र अशा विद्यार्थ्यांना "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल. 
  प्रथम प्राधान्य क्रमाच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचा प्रवेश रद्द करता येईल. तथापि त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास अशा विद्यार्थ्यांना "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल. 
  प्रथम पसंतीक्रम व्यतिरिक्त अन्य प्राधान्यक्रमांच्या शाखेत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास, प्रवेश प्रक्रियेच्या उर्वरित सर्वसाधारण फेरी व विशेष फेरीमध्ये "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" सहभाग घेऊ शकतील, तथापि घेतलेले प्रवेश रद्द करण्याची मुभा असेल. प्रवेश रद्द केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय बदलण्यासाठी अर्ज करता येईल. 
  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जातील मजकूर व प्रत्यक्षात प्रवेशाच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे व माहितीमध्ये तफावत/भिन्नता आढळल्यास विशेष फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात येईल. परंतू "सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)" या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेण्यास संबंधित विद्यार्थी पात्र असतील. तथापि इयत्ता १० वीच्या गुणपत्रकामध्ये फेरफार असल्यास त्यापुढील कोणत्याही फेरीमध्ये प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थी पात्र असणार नाही. 
 महाविद्यालयात/शाळेत विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासून एकदा प्रवेश निश्चित केल्यास त्या प्रवर्गातील उमेदवारास प्रवेश रद्द करून दुसऱ्या ठिकाणी प्रवेश (गुणवत्तेनुसार) मिळाल्यास तो विद्यार्थी पात्र असेल. नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा/ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कागदपत्रे पडताळणीची आवश्यकता असणार नाही. तथापि मूळ कागदपत्रे नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा/ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावी लागतील.