पेपरफुटीला देशद्रोह मानून कठोर शिक्षा द्या; राजेंद्र चोरगे
सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांची तयारी करतात. मात्र पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. "एका पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची 10 ते 12 वर्षांची तपश्चर्या वाया जाते. ही माणुसकीची हत्या आहे," असे चोरगे यांनी म्हटले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पेपरफुटीच्या वाढत्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत असून, अशा गुन्ह्यांना केवळ परीक्षा गैरव्यवहार म्हणून न पाहता देशद्रोहासमान मानून कठोर शिक्षा देण्याची मागणी साताऱ्यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.
राजेंद्र चोरगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेपरफुटी हा केवळ परीक्षा व्यवस्थेवरील हल्ला नसून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि देशाच्या भविष्यातील गुणवत्तेचा खून आहे. पेपरफुटीमुळे सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर आणि लांच्छनास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांची तयारी करतात. मात्र पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. "एका पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची 10 ते 12 वर्षांची तपश्चर्या वाया जाते. ही माणुसकीची हत्या आहे," असे चोरगे यांनी म्हटले आहे.
पेपरफुटीमुळे देशाच्या विकासालाही मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी होण्याची क्षमता असलेले गुणवंत विद्यार्थी निराश होतात, तर गैरमार्गाने यश मिळविणाऱ्यांमुळे व्यवस्थेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. यामुळे भ्रष्ट व्यवस्थेला खतपाणी मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
गेल्या एका वर्षात NEET, MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती आदी विविध परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्याने अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या. या घटनांमुळे 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आरोपींना किरकोळ शिक्षा होत असल्याने अशा गुन्ह्यांना आळा बसत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
पेपरफुटीतील आरोपींवर केवळ कॉपीविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई न करता भारतीय न्याय संहिता कलम 152 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच दोषींना किमान 10 लाख रुपयांचा दंड, 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि संपत्ती जप्तीची शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.
"भारताला जगातील अग्रगण्य राष्ट्र बनवायचे असेल तर शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि गुणवत्ता अबाधित ठेवणे अत्यावश्यक आहे. पेपरफुटीसारख्या शिक्षणविरोधी गुन्ह्यांविरोधात कठोर आणि प्रभावी कारवाई केल्याशिवाय विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित होणार नाही," असे मत राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केले.