UGC ने दिली तीन प्रमुख विदेशी विद्यापीठांना मंजुरी; मुंबई आणि बेंगळुरूत नवीन कॅम्पस, NEP २०२० च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
मुंबई आणि बेंगळुरू हे भारतातील ज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचे प्रमुख केंद्र आहेत. या कॅम्पसद्वारे विद्यार्थ्यांना जगातील उच्च दर्जाचे शिक्षण भारतातच मिळेल, परदेशी शिक्षणासाठी होणारा खर्च आणि मेंदू पळवाट थांबेल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाला (Internationalization) चालना देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) तीन प्रमुख विदेशी विद्यापीठांना मंजूरीचे पत्र (Letter of approval) दिले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क दोन्ही विद्यापीठाचे कॅम्पस मुंबई येथे तर युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सचे बेंगळुरू येथे उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. ही बातमी NEP २०२० च्या 'आंतरराष्ट्रीयीकरण' धोरणानुसार महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत उच्च शिक्षण सचिव आणि युजीसीचे अध्यक्ष डॉ. विनीत जोशी यांनी ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयांच्या प्रतिनिधींसह विद्यापीठांच्या प्रतिनिधींना मंजूरीचे पत्र सुपूर्द केले. यासह युजीसीने आतापर्यंत पाच विदेशी विद्यापीठांना पूर्ण मंजुरी दिली आहे. यात युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन आणि लिव्हरपूलचा समावेश आहे.
एंटरप्राइझ कॅम्पस ब्रिस्टल मुंबई येथे इमर्सिव आर्ट्स, फायनान्स, डेटा सायन्स, इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, एंटरप्रेन्युअरशिप आणि इनोव्हेशन या क्षेत्रांतील अभ्यासक्रम उपलब्ध. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क मुंबई येथे फायनान्स, कॉम्प्युटर सायन्स विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, बिझनेस, इकॉनॉमिक्स, क्रिएटिव इंडस्ट्रीज आणि मॅनेजमेंट या विषयांवर भर देण्यात येणार आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत.
UNSW बेंगळुरू येथे बिझनेस, कॉम्प्युटर सायन्स, सायबर सिक्युरिटी, रिन्यूएबल एनर्जी, हेल्थ आणि ट्रान्सपोर्ट या क्षेत्रांत अभ्यासक्रम आणि संशोधन उपलब्ध होणार आहेत. क्युएस रँकिंग २०२६ मध्ये टॉप-२० मधील UNSW ही भारतातील सर्वोच्च रँक असलेली विदेशी संस्था ठरणार आहे.
मुंबई आणि बेंगळुरू हे भारतातील ज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचे प्रमुख केंद्र आहेत. या कॅम्पसद्वारे विद्यार्थ्यांना जगातील उच्च दर्जाचे शिक्षण भारतातच मिळेल, परदेशी शिक्षणासाठी होणारा खर्च आणि मेंदू पळवाट थांबेल. अभ्यासक्रमांची गुणवत्ता, फी आणि प्रवेश प्रक्रिया ही मुख्य कॅम्पसप्रमाणे राहील, असे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.