तीन वर्ष विधी (LLB) सीईटीचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

मुंबई उपनगरातील अमेय विश्वेश राजगुरू, ठाण्यातील जीत संजय बर्दापूरकर, पूर्व दिल्लीतील अक्षत भारद्वाज आणि राजस्थानातील सीकर येथील मोहम्मद रिजवान यांनी १०० पर्सेंटाईल मिळवत सर्वोच्च यश संपादन केले.

तीन वर्ष विधी (LLB) सीईटीचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेण्यात आलेल्या तीन वर्षीय विधी (LLB 3 Years) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण चार विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले असून त्यापैकी दोन विद्यार्थी महाराष्ट्रातील तर दोन विद्यार्थी राज्याबाहेरील आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल वैयक्तिक लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात आला असून प्रवेशासाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) लवकरच सुरू होणार आहे.

यंदाच्या परीक्षेत मुंबई उपनगरातील अमेय विश्वेश राजगुरू, ठाण्यातील जीत संजय बर्दापूरकर, पूर्व दिल्लीतील अक्षत भारद्वाज आणि राजस्थानातील सीकर येथील मोहम्मद रिजवान यांनी १०० पर्सेंटाईल मिळवत सर्वोच्च यश संपादन केले.

खुला प्रवर्गात अमेय विश्वेश राजगुरू (मुंबई उपनगर) आणि जीत संजय बर्दापूरकर (ठाणे) यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गात पालघरचे रोशन विलास वनमाळी (९९.९८), अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात ठाण्याचे अक्षय रमेश विरनाक (९९.६२), डीटी/व्हीजे प्रवर्गात परभणीचे विशाल शामराव पवार (९९.९९), एनटी-१ (बी) प्रवर्गात गडचिरोलीचे अक्षय अशोक मेश्राम (९९.९७), एनटी-२ (सी) प्रवर्गात साताऱ्याचे अविनाश भगवान घुटूकडे (९९.९८), एनटी-३ (डी) प्रवर्गात नाशिकच्या आदिती संतोष कुटे (९९.९५), ओबीसी प्रवर्गात बीडचे भगवान अजस महिमुड आणि अकोल्याचे प्रेम प्रमोद घाटोळ (दोघेही ९९.९९), एसबीसी प्रवर्गात सोलापूरच्या सुरभी गिरीधर लाटणे (९९.७३) तसेच एसईबीसी प्रवर्गात पुण्याचे ओम संतोष जाधव (९९.९८) यांनी सर्वोच्च पर्सेंटाईल मिळवला.

तीन वर्षीय विधी सीईटी परीक्षा १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी चार सत्रांमध्ये घेण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण ८३ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये ४५ हजार १११ विद्यार्थी, २४ हजार ३५८ विद्यार्थिनी तसेच ४ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षेची एकूण उपस्थिती ८३.२१ टक्के इतकी नोंदविण्यात आली.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १५६ परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित (CBT) पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. परीक्षेला राज्यातील ६७ हजार ९४९ तर राज्याबाहेरील १ हजार ५२४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

पर्सेंटाईल आणि टक्केवारीतील फरक समजून घ्या

सीईटीचा निकाल पर्सेंटाईलमध्ये जाहीर केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना टक्केवारीपेक्षा पर्सेंटाईलला महत्त्व द्यावे, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. टक्केवारी म्हणजे मिळालेल्या गुणांचे प्रमाण, तर पर्सेंटाईल हे इतर उमेदवारांच्या तुलनेत विद्यार्थ्याचे स्थान किंवा क्रमवारी दर्शवते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पर्सेंटाईल अधिक महत्त्वाचा मानला जातो.