मुंबईतील नोकरीसाठी ‘फक्त गुजराती-मारवाडी’ जाहिरात; भरती क्षेत्रात भाषिक भेदभावाचा वाद

एक्सीलन्स इन जनरल मॅनेजमेंट (EGM) आणि अकाउंट्स-फायनान्स पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. जाहिरातीनुसार मुंबईतील या पदासाठी वार्षिक २० ते २५ लाख रुपये इतके आकर्षक वेतन देण्यात येणार आहे.

मुंबईतील नोकरीसाठी ‘फक्त गुजराती-मारवाडी’ जाहिरात; भरती क्षेत्रात भाषिक भेदभावाचा वाद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या भरती प्रक्रियेत (recruitment process) भाषिक प्राधान्य देणाऱ्या जाहिरातीने (Linguistic preference in advertising) मुंबईत पुन्हा एकदा भाषिक तणाव (Linguistic tension) निर्माण केला आहे. अहमदाबादस्थित एका भरती एजन्सीने नोकरी.कॉम आणि लिंक्डइनवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत ‘फक्त गुजराती-मारवाडी उमेदवार (Gujarati-Marwari candidate) अर्ज करू शकतात’ असे स्पष्ट उल्लेख केल्याने मराठी तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

एक्सीलन्स इन जनरल मॅनेजमेंट (EGM) आणि अकाउंट्स-फायनान्स पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. जाहिरातीनुसार मुंबईतील या पदासाठी वार्षिक २० ते २५ लाख रुपये इतके आकर्षक वेतन देण्यात येणार आहे. मात्र, पात्रतेत भाषिक समाजाचा स्पष्ट उल्लेख करून केवळ गुजराती आणि मारवाडी उमेदवारांनाच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे ‘मुंबईत नोकरीसाठी मराठी उमेदवारांना डावलले जात आहे का?’ असा सवाल उपस्थित झाला आहे.

वादग्रस्त जाहिरातीवर एजन्सीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आम्ही रिक्रुटमेंट कंपनी आहोत. विविध कंपन्यांच्या विशिष्ट गरजेनुसार जाहिराती प्रसिद्ध करतो. एखाद्या कंपनीला त्या पदासाठी विशिष्ट भाषेचे ज्ञान असलेला उमेदवार हवा असल्यास आम्ही त्यानुसार जाहिरात देतो. आमच्या क्लायंट कंपन्यांमध्ये विविध भाषा आणि भागातील लोक काम करतात. याचा वेगळा अर्थ काढू नये.” एजन्सीने भाषिक गरज ही क्लायंट कंपनीची आवश्यकता असल्याचे सांगितले असले तरी, मुंबईसारख्या बहुभाषिक महानगरात नोकरीच्या जाहिरातीत एखाद्या विशिष्ट भाषिक-समाजिक गटाला प्राधान्य देणे भेदभावात्मक असल्याची टीका होत आहे. 

काही कंपन्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी किंवा विशिष्ट व्यवसायिक नेटवर्कसाठी विशिष्ट भाषिक उमेदवारांना प्राधान्य देतात. मात्र, सार्वजनिक जाहिरातीत असे स्पष्ट उल्लेख करणे कायद्याच्या दृष्टीने आणि नैतिक दृष्टीने योग्य नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीने मोठी चर्चा निर्माण केली आहे. “मुंबईत राहून, मुंबईत काम करायचे तर मराठी उमेदवारांना कुठे जायचे?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काहींनी या जाहिरातीवर कारवाईची मागणी केली असून, मराठी-गुजराती वाद पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.