राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी; २३ वर्षांनंतर ३,७२३ पदांची भरतीचा मार्ग मोकळा

विद्यापीठनिहाय मंजूर पदांची संख्या अशी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १,२१७ पदे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ९१५ पदे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे ८९० पदे तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ५८९ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी; २३ वर्षांनंतर ३,७२३ पदांची भरतीचा मार्ग मोकळा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांच्या (4 agricultural universities) गट अ आणि गट ब संवर्गातील तब्बल ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला राज्य शासनाने मंजुरी (Approval for staffing pattern of 3,723 posts) दिली आहे. २३ वर्षांनंतर घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विद्यापीठांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू (Recruitment process to start soon) होणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी या निर्णयाची माहिती देताना शेतकऱ्यांच्या गरजा आणि शेतीसमोरील नवीन आव्हानांचा विचार करून हा आकृतीबंध तयार करण्यात आल्याचे सांगितले.

राज्य शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार, नियमित ३,६११ पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी ११२ पदे अशा एकूण ३,७२३ पदांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या प्रशासकीय व शैक्षणिक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

विद्यापीठनिहाय मंजूर पदांची संख्या अशी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १,२१७ पदे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ९१५ पदे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे ८९० पदे तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ५८९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून संशोधनाला चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा, हवामान बदल, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा विचार करून हा आकृतीबंध अंतिम करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होईल आणि कृषी क्षेत्रात नवीन संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

गट क आणि गट ड संवर्गातील पदांच्या आकृतीबंधाबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. हा निर्णय कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरेल आणि महाराष्ट्राच्या कृषी विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.