“विकसित महाराष्ट्र – २०४७” विषयावर व्यापक चर्चासत्र 

स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींचा मोठा वेळ मूलभूत नागरी तक्रारी सोडवण्यात जात असल्याने धोरणात्मक नियोजनासाठी मर्यादा निर्माण होतात. वाढते शहरीकरण, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पूरस्थिती, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणे यांसारख्या आव्हानांवर त्यांनी भाष्य केले.

“विकसित महाराष्ट्र – २०४७” विषयावर व्यापक चर्चासत्र 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG), महाराष्ट्र यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित “शहरी संवाद” कार्यक्रम मालिकेंतर्गत “विकसित महाराष्ट्र – २०४७” या विषयावर एकदिवसीय व्यापक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाश्वत व सर्वसमावेशक शहरी विकासासाठी आवश्यक धोरणात्मक दिशा आणि उपाययोजनांवर धोरणकर्ते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच शहरी विकास क्षेत्रातील तज्ज्ञांनी सखोल विचारमंथन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी  यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी महानगरपालिकांचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच AIILSG चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सत्रात स्वागत व मान्यवरांच्या सत्कारानंतर दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.

 मेधा कुलकर्णी यांनी निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींचा मोठा वेळ मूलभूत नागरी तक्रारी सोडवण्यात जात असल्याने धोरणात्मक नियोजनासाठी मर्यादा निर्माण होतात. वाढते शहरीकरण, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पूरस्थिती, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणे यांसारख्या आव्हानांवर त्यांनी भाष्य केले. तसेच डिजिटल प्रशासन, वैज्ञानिक शहरी नियोजन, पावसाचे पाणी साठवण आणि तज्ज्ञाधारित निर्णय प्रक्रियेवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “विन-विन” उपाययोजना स्वीकारून शाश्वत व राहण्यायोग्य शहरे निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

AIILSG चे महासंचालक मा. जयराज पाठक (भा.प्र.से. निवृत्त) यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या योगदानाचा आढावा सादर करताना शहरी प्रशासन बळकट करण्यात संस्थेची भूमिका अधोरेखित केली. “विकसित महाराष्ट्र – २०४७” साध्य करण्यासाठी शासन, स्थानिक संस्था आणि नागरिक यांच्यात समन्वय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी “शताब्दीची वाटचाल” या स्मरणिकेचे तसेच शहरी कचरा व्यवस्थापन, परिपत्रक अर्थव्यवस्था आणि फिकल स्लज व सेप्टेज व्यवस्थापनावरील दोन श्वेतपत्रिकांचे प्रकाशन मा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोप सत्रात मा. चंद्रकांत खोसे (सहसंचालक, नगर पालिका प्रशासन संचालनालय) आणि मा. रवी रंजन गुरु (उपमहासंचालक, AIILSG) यांनी मार्गदर्शन केले. महासंचालक मा. जयराज पाठक यांनी सर्व सत्रांतील प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेत २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने आवश्यक पुढील वाटचाल स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता गव्हाणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. जीवन सोनावणे, विभागीय संचालक, AIILSG यांनी केले.या चर्चासत्रातून “विकसित महाराष्ट्र – २०४७” या दृष्टीकोनाला दिशा देणारे महत्त्वपूर्ण विचार आणि शहरी विकासासाठी ठोस धोरणात्मक मांडणी समोर आली.