प्राध्यापक भरतीवर पूनर्विचार न केल्यास तीव्र आंदोलन; संघटनांचा इशारा,बेरोजगार प्राध्यापक रस्त्यावर

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्राध्यापकांची नियुक्ती करण्याऐवजी शासनातर्फे अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या संख्येत घट केली जात आहे. 

प्राध्यापक भरतीवर पूनर्विचार न केल्यास तीव्र आंदोलन; संघटनांचा इशारा,बेरोजगार प्राध्यापक रस्त्यावर
Unemployed professors and teacher union members stage a protest demanding a review of professor recruitment policies. The growing recruitment crisis has sparked concerns across the higher education sector.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पूर्णवेळ प्राध्यापकांची पदे भरली जात नसल्याने शासनाने तासिका तत्त्वावर (CHB) प्राध्यापक नियुक्तीचा पर्याय स्वीकारला. परंतु, पूर्णवेळ तर सोडाच आता तासिका तत्वावरील प्राध्यापकांची संख्याही कमी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये कोण शिकवणार? आणि बेरोजगार झालेल्या प्राध्यापकांनी करायचे काय ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पूर्णवेळ प्राध्यापकांची पदे मंजूर करताना ती समान पद्धतीने मंजूर करावीत तसेच CHB प्राध्यापकांची पदे कमी न करता मागील वर्षीप्रमाणे भरण्यास मान्यता द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्राध्यापक संघटनेतर्फे देण्यात आला आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांनी रोजगार क्षमता विषयांची निवड करून स्वतःच्या पायावर उभे राहावे,अशी अपेक्षा NEP च्या माध्यमातून व्यक्त केली गेली. परंतु, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्राध्यापकांची नियुक्ती करण्याऐवजी शासनातर्फे अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या संख्येत घट केली जात आहे. 

जून महिन्यात पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती करण्याचे उद्दिष्ट उच्च शिक्षण विभागाने समोर ठेवले होते. परंतु, अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टर तपासणीचे कामच पूर्ण झालेले नाहीत. रोस्टर तपासणीनंतर जाहिरात प्रसिद्ध होणे, अर्ज मागवणे, अर्जांची छाननी करणे, पात्र उमेदवारांना मुलाखतीच बोलवणे, मुलाखत झाल्यानंतर पात्र उमेदवारांची नियुक्ती करणे, त्याचप्रमाणे नियुक्त उमेदवाराला रुजू करून घेणे, या सर्व प्रक्रियेला बराच कालावधी जाणार आहे. असे असताना शासनाने सीएसबी प्राध्यापकांच्या जागा कमी केल्या आहेत. त्यावर प्राध्यापक, प्राचार्य, तसेच संस्थाचालकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

------------------------------------------------------------

पूर्णवेळ ५ हजार १२ प्राध्यापकांची पदे भरण्यास आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल असे एकूण संथ गतीने सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे लक्षात येते. शासनाने अद्याप एनईपीनुसार वर्कलोड निश्चित केलेला नाही. प्राध्यापकांचा वर्कलोड कमी करणार नसल्याचे यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. परंतु, राज्यातील हजारो सीएसबीची पदे कमी करण्यात आली आहेत. हजारो प्राध्यापक बेरोजगार होणार आहेत. उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला असताना प्राध्यापकांची संख्या कमी करणे हे विरोधाभासी आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, असे शासनाचे धोरण असणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकर सुरू करून सीएसबी धारकांची कमी केलेली पदे पूर्ववत करावी, अन्यथा महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल. 
- डॉ.संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, नव प्राध्यापक संघटना
---------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करून आणि पूर्णवेळ प्राध्यापक आणि सीएसबी प्राध्यापकांची संख्या कमी करून शासनाने विद्यार्थ्यांनी अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकूच नये,अशी तजवीज शासनाने केली आहे. पूर्णवेळ प्राध्यापकांची पदे अद्याप भरलेली नाहीत त्यात सीएचबी प्राध्यापकांची ६० ते ६५ टक्के कमी केली  आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकच राहणार नाहीत. परिणामी गोरगरीब विद्यार्थी शिक्षणाच घेणार नाहीत. शासनाला प्राध्यापकांची पदे कमी करून नेमके काय साध्य करायचे आहे. उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक पदासंदर्भात तात्काळ पुनर्विचार करावा, अन्यथा सर्व संघटनांना एकत्रित येऊन तीव्र आंदोलन करावे लागेल. 
- प्रवीण ताटे देशमुख, सचिव स्पुक्टो, प्राध्यापक संघटना
_________________________________________________

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या NEP प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नियुक्त करणे आवश्यक आहे. परंतु राज्य शासनातर्फे प्राध्यापक भरती करताना महाविद्यालयांना कमी अधिक प्राध्यापकांची पदे मंजुरी दिली जाते.तसेच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची पदे कमी करण्यात आली आहे. याचा परिणाम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणार असून बेरोजगार प्राध्यापक वाढणार आहेत.शासनातर्फे दुर्बल महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सारख्या महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. त्याचप्रमाणे राज्यातील गरीब व मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यायला हवा. त्याशिवाय NEP ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही.तसेच प्राध्यापकांची पदे कमी केल्याने नाईलाजास्तव विनाअनुदानित तत्वावर प्राध्यापकांची पदे भरावी लागतील.त्यामुळे महाविद्यालयांना शूलकवाढ करावी लागले. परिणामी त्याचा आर्थिक बोजा विद्यार्थ्यांवर पडेल.त्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून दूर जाण्याचा धोका निर्माण होईल.त्यामुळे शासनाने कमी केलेल्या प्राध्यापकांच्या पदाबाबत तातडीने पुनर्विचार करावा.अन्यथा विद्यार्थी व बेरोजगार यांच्यात असंतोष निर्माण होऊन त्यातून मोठी आंदोलने उभी राहतील. 
- डॉ. गजानन एकबोटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
-------------------------------------------------------------------

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांची आवश्यकता आहे. मात्र, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयाला प्राध्यापक भरती साठी एकही प्राध्यापक पद मंजूर झाले  नाही. त्यातच आता गरवारे महाविद्यालयाचे 108 पैकी केवळ 36 CHB  प्राध्यापक उच्च शिक्षण विभागाने मंजूर केले आहेत. आमच्या संस्थेतर्फे सीएचबी प्राध्यापकांना चाळीस हजार रुपये मानधन दिले जाते. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी महाविद्यालयाला प्राध्यापकांची नियुक्ती करावीच लागणार आहे. पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत सीएसबी हाच एकमेव पर्याय आहे. ही पदे कमी केल्यास संस्थेवर अधिकचा भार पडणार आहे. महाविद्यालय चालवणे अवघड जाणार आहे.त्यामुळे राज्य शासनाने याबाबत पुनर्विचार करावा. 
- बाबा शिंदे, अध्यक्ष, नियमक मंडळ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,

-------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अद्याप राज्य शासनाने प्राध्यापकांचा वर्कलोड निश्चित केलेला नाही. त्यातच आता सीएचबी धारकांची पदे कमी केली  आहेत. NEP नुसार विषयांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे त्या त्या विषयासाठी प्राध्यापक नियुक्ती करावीच लागणार आहे. प्राध्यापकांची संख्या कमी केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होईल. राज्य शासनाने प्राचार्य संघटनेला या संदर्भात चर्चा करण्यास वेळ द्यावा. या सर्व प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढणे गरजेचे आहे.

- डॉ.सुधाकर जाधवर, अध्यक्ष, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

------------------------ 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मूलभूत उद्दिष्टांना बाधक ठरत असून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या विविधतेवर तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम करणारी आहे. याशिवाय राज्यातील हजारो तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होत आहे.राज्यातील महाविद्यालयांमध्ये नियमित प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून नियमित भरती प्रक्रिया पूर्ण क्षमतेने राबविण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत तासिका तत्त्वावरील शिक्षक हे उच्च शिक्षण व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून कार्यरत आहेत. कार्यभार कृत्रिमरीत्या कमी झाल्यास हजारो शिक्षक बेरोजगारीच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता आहे.
-डी. बी. पवार, अध्यक्ष
ABRSM, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघ