शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात तब्बल ३०, २०९ पदांसाठी पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया सुरू
पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५२, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगरपालिका व नगरपरिषदांच्या २८० तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८ अशा एकूण ३० हजार २०९ पदांची भरती करण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात शिक्षक भरतीची (Teacher Recruitment 2026) प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच शासकीय शाळांतील इयत्ता १ ली ते १२ वीसाठी शिक्षण सेवक व शिक्षक पदांच्या एकूण ३० हजार २०९ रिक्त जागांसाठी (A total of 30,209 vacant posts) भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत (Pavidra Portal) पार पडणार असून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) उत्तीर्ण उमेदवारांना यात सहभागी होता येईल. शासनादेशानुसार रिक्त पदे व आरक्षण विचारात घेऊन ८० टक्के पदांची भरती करण्याचे नियोजित आहे.
पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५२, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगरपालिका व नगरपरिषदांच्या २८० तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८ अशा एकूण ३० हजार २०९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. चाचणीतील प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि मुलाखतीशिवाय अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने आता रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. पोर्टलवर लॉगिन करून प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक असून त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा ६ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झाली आहे. उमेदवारांना ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पसंतीक्रम लॉक करणे बंधनकारक आहे.
उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन लॉगिन करावे. प्राधान्यक्रम नोंदवण्याबाबत आवश्यक सूचना पोर्टलवर देण्यात आल्या असून उमेदवारांना एसएमएसद्वारेही कळविण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
ही भरती राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील रिक्त जागा भरण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत पसंतीक्रम नोंदवून प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून गुणवत्ता यादीत योग्य स्थान मिळू शकेल. अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.