अपुऱ्या सुविधा व धोकादायक इमारत, तरीही बारावीचे परीक्षा केंद्र, नियोजनावर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे शाळेचे बांधकाम अद्याप अपूर्ण असून परिसरात सुरू असलेले काम स्पष्टपणे दिसून येते. अशा स्थितीत परीक्षा केंद्र मंजूर करणे हे शिक्षण मंडळाच्या नियमांचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून होत आहे. इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याच ठिकाणावरून विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात जावे लागत होते. जीव मुठीत धरून परीक्षा कक्षात गेल्यानंतर मनामध्ये भीती होती, आणि याच परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरातील एकमेव बारावीचे परीक्षा केंद्र (Class 12th examination center) असलेल्या डायमंड ज्युबली कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये (Diamond Jubilee Convent School) सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान गंभीर अनागोंदी, गैरव्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. परीक्षा केंद्रासाठी आवश्यक असलेल्या अपुऱ्या सुविधा, धोकादायक इमारत (Inadequate facilities, dangerous building)असताना तरीही परीक्षेचे केंद्र दिल्याने परीक्षा नियोजनावर प्रश्नचिन्ह (Question mark on exam planning) उपस्थित केले आहेत.
परीक्षेसारख्या अत्यंत वेळबद्ध आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रक्रियेत असा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनावर थेट परिणाम करणारा ठरला. प्रवेश प्रक्रियेतील विलंब, वर्गखोल्यांची योग्य तयारी नसणे, आसन व्यवस्थेतील गोंधळ आणि प्रश्नपत्रिका वाटपात उशीर झाल्यामुळे परीक्षेच्या ऐन क्षणी विद्यार्थ्यांना तीव्र तणावाखाली सामोरे जावे लागले.
विशेष म्हणजे शाळेचे बांधकाम अद्याप अपूर्ण असून परिसरात सुरू असलेले काम स्पष्टपणे दिसून येते. अशा स्थितीत परीक्षा केंद्र मंजूर करणे हे शिक्षण मंडळाच्या नियमांचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून होत आहे. इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याच ठिकाणावरून विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात जावे लागत होते. जीव मुठीत धरून परीक्षा कक्षात गेल्यानंतर मनामध्ये भीती होती, आणि याच परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली.
विद्यार्थ्यांसाठी पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना गैरसोयीच्या अवस्थेत परीक्षा द्यावी लागली. शाळेला संरक्षक भिंत नसल्यामुळे बाहेरील परिसर पूर्णतः असुरक्षित आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे काही परीक्षा कक्ष पहिल्या मजल्यावर असून तेथे जाण्यासाठी सुरक्षित व नियमानुसार जिन्याची व्यवस्था नाही. अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना दीर्घकाळ बाहेर उभे ठेवणे आणि वेळेचे कोणतेही नियोजन नसणे, हे शिक्षण मंडळाच्या प्रशासनिक अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
परीक्षा केंद्र मंजुरीपूर्वी भौतिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती का, की केवळ कागदोपत्री मंजुरी देण्यात आली, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी. तसेच त्वरित सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किंवा पर्यायी, सुरक्षित परीक्षा केंद्र जाहीर करावे, अशी ठाम मागणी पालक, विद्यार्थी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी, वेळेशी आणि भविष्यासोबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.