शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम करणाऱ्या जिल्ह्यांना ५ कोटीचे पारितोषिक; दादा भुसे यांची घोषणा

शालेय स्तरावरील १५ समित्यांचे रूपांतर चार समित्यांमध्ये करून अधिक प्रभावी कामकाज सुरू असल्याचे सांगून, पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम करणाऱ्या जिल्ह्यांना ५ कोटीचे पारितोषिक; दादा भुसे यांची घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना (education activities) चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना ( Zilla Parishad and Municipal Corporations) अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय क्रमांकास ३ कोटी आणि तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री  दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)यांनी शुक्रवारी पुण्यात केली.

बालेवाडी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी दादा भुसे बोलत होते. या प्रसंगी शालेय विभागाचे प्रधान सचिव रनजीत सिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदकुमार बेडसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालनालय (योजना) पुणेचे संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक अनुराधा ओक आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, “शिक्षण हे आनंददायी, गुणवत्तापूर्ण, भाकरीचे आणि राष्ट्रीयत्वाचे असले पाहिजे.” महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजे आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा सुधारणा, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, शिष्यवृत्ती परीक्षा व निपुण भारत अभियान यावर त्यांनी भर दिला.

शालेय स्तरावरील १५ समित्यांचे रूपांतर चार समित्यांमध्ये करून अधिक प्रभावी कामकाज सुरू असल्याचे सांगून, पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. “विद्यार्थी हेच आपले दैवत असून शिक्षक हे शाळारूपी मंदिराचे पुजारी आहेत,” असे उद्गार काढून दादा भुसे यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या चौकसपणासाठी शैक्षणिक सहलींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ऐतिहासिक स्थळांना भेटी, शेतीतील कामांचे निरीक्षण, बँकेचे व्यवहार समजण्यासाठी सहली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा, तसेच बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा घेण्याचेही निर्देश दिले.

 रनजीत सिंह देओल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शिक्षण व आरोग्य या दोन क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करावे.  तसेच शासन निर्णय तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्षमतेने पुढाकार घ्यावा, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. उद्घाटन सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शिक्षक व अधिकारी-कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संशोधन विभाग प्रमुख डॉ. दत्ता थिटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले.