विद्यार्थी, प्राध्यापकांनो ! चहासाठी पितृ पंधरवड्यापर्यंत थांबा; विद्यापीठात चहा मिळेना...

चहा, स्नॅक्स यांसह इतर गोष्टींसाठी मुलांची परवड होत आहे.पितृपंधरवडा  संपल्यावर चहा आणि इतर अन्नपदार्थांचे शॉप सुरू केले जाणार आहेत.

विद्यार्थी, प्राध्यापकांनो ! चहासाठी पितृ पंधरवड्यापर्यंत थांबा; विद्यापीठात चहा मिळेना...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)विद्यार्थी व प्राध्यापकांना साधा चहा मिळणेही सध्या अवघड (difficult to even get tea)झाले आहे. विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या फूड मॉलमध्ये (Food Mall)काही शॉप निविदा काढून नवीन कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. परंतु,सध्या पितृपंधरवडा सुरू असल्यामुळे त्यांनी अद्याप शॉप सुरू केले नाहीत. त्यामुळे विद्यापीठ परिसरातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (student)तसेच काम करणाऱ्या प्राध्यापक (professor) व इतर कर्मचाऱ्यांना चहासाठी भटकण्याची वेळ आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ओपन कॅन्टीन, ओल्ड कॅन्टीन, अनिकेत कॅन्टीन येथे पूर्वी केवळ विद्यापीठातीलच नाही तर विद्यापीठा बाहेरील नागरिकांची मोठी गर्दी असायची. विद्यापीठातील काही पदार्थ खाण्यासाठी म्हणून आजी-माजी विद्यार्थी ठराविक वेळेत या कॅन्टीनमध्ये येऊन बसायचे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून या तीनही कॅन्टीन बंद केल्या आहेत. विद्यापीठाच्या प्रिंटिंग प्रेसच्या मागच्या बाजूला आणि विधी विभागाच्या जवळ फूड मॉल सुरू करण्यात आला आहे. परंतु,  या फुड मॉलमध्ये विद्यार्थ्यांना हवे असणारे अन्नपदार्थ मिळत नाहीत. विद्यापीठाने या फुड मॉलमधील ' शॉप' ची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. दोन शॉप नवीन कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून या जागेचे भाडेही घेण्यात आले आहे. परंतु, अद्याप त्यांनी हे शॉप सुरू केले नाही. त्यामुळे चहा, स्नॅक्स यांसह इतर गोष्टींसाठी मुलांची परवड होत आहे.पितृपंधरवडा  संपल्यावर चहा आणि इतर अन्नपदार्थांचे शॉप सुरू केले जाणार आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना सध्या विद्यापीठातील परीक्षा विभागाजवळील कँटिनमध्ये चहा घेण्यासाठी जावे लागत आहे.  

विद्यापीठाने जाहीर केलेल्या नियमावालीतील निकषांमध्ये बसणाऱ्या कंत्राटदारांना दोन शॉप देण्यात आले आहेत. तर काही जून शॉप हे कंत्राटदाराने परस्पर दुसऱ्या भाडेकरूंना दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र,गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन बंद आहे. विद्यार्थ्यांना आवडीचे अन्नपदार्थ खाण्यासाठी विद्यापीठाच्या आवाराबाहेर जावे लागते. आता तर विद्यापीठात चहा मिळणे ही अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची विद्यार्थ्यांप्रती असणारी जबाबदारी प्रशासनाकडून पूर्णत्वास नेली जाते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे?