विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
प्रभावित विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदला नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी विभागाने विशेष कार्यप्रणाली तयार करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करणाऱ्या संस्थांना आता कठोर शिक्षा होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक (Fraud Against Students) करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर थेट फौजदारी गुन्हे (Criminal Offenses) दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यासोबतच अशा संस्थांची विद्यापीठ कायद्यानुसार मान्यताही रद्द (Recognition Also Revoked) करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. मुंबईतील एका महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे या आर्किटेक्चर महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. संस्थेकडे विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेला अभ्यासक्रम चालवून विद्यार्थ्यांची आर्थिक आणि शैक्षणिक फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर मंत्री पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
“विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच खपवून घेतले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे मंत्री पाटील म्हणाले. महाराष्ट्र राज्य कृषी, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अभ्यासक्रम प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गतही कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले आहेत.
प्रभावित विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदला नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी विभागाने विशेष कार्यप्रणाली तयार करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी उच्च शिक्षण संचालनालय किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर संस्था आणि अभ्यासक्रमाची मान्यता तपासून घ्या. अनधिकृत संस्थांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन मंत्री पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यी आणि पालकांना करण्यात आले आहे.