बालभारतीची पुस्तके खरेदी करताय? सावधान,ही पुस्तके बदलणार; नोंदवही बंधनकारक
शैक्षणिक वर्ष 2026- 27 हे इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे.त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीतर्फे उपलब्ध करून दिली जाणारी पुस्तके यावर्षी बदलणार आहेत. त्यामुळे बालभारतीची कोणती पुस्तके घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत, याबाबत बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 2026-27 या शैक्षणिक वर्षात जून 2026 मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत, त्यामुळे पालकांनी ही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करावीत.
शैक्षणिक वर्ष 2026- 27 हे इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे.त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी, अशा सूचना बालभारतीतर्फे संबंधितांना करण्यात आल्या आहेत. इयत्ता दुसरी, तिसरी,चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमासाठी 'शिकू मराठी आनंदे' तसेच हिंदी, उर्दू ,गुजराती, कन्नड, सिंधू, तेलगू, तमिळ व बंगाली या इतर माध्यमांसाठी 'करू मैत्री मराठीशी' ही मराठी भाषेची अनिवार्य पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इयत्ता सहावी साठी हिंदी सुलभभारती व हिंदी सुगमभारती तसेच सुगमभारती (कन्नड संयुक्त) तारुफे उर्दू, सिंधू भारती अरे /देव, तेलुगु सरल भारती, गुजराती साहित्य परिचय ही पुनर्मुद्रण (जुन्या अभ्यासक्रमाची) वैकल्पिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इयत्ता पाचवी, सातवी व इयत्ता आठवीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय मूल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित आहेत. ही पाठ्यपुस्तके भांडारात शिल्लक असून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
इयत्ता नववी ते बारावी साठी विषय योजना व मूल्यमापन योजनेनुसार विद्यार्थ्यांनी या इयत्ता साठी बालभारतीने तयार केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवही चा वापर करणे बंधनकारक राहील कोणत्याही शैक्षणिक संस्थेने खाजगी प्रकाशकांच्या प्रात्यक्षिक नोंदवही चा वापर करण्याचे बंधन किंवा शक्ती विद्यार्थ्यांवर करू नये.
पाठ्यपुस्तक महामंडळातर्फे महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केलेली आहे या स्वाध्याय पुस्तिकांच्या दर्शनी किमतीवर 40% सूट देण्यात येत आहे तरी विद्यार्थ्यांनी या स्वाध्यायपुस्तिकांचा वापर करावा, असे आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केले आहे.