AI च्या युगात शाळांमधील संगणक लॅब बंद; 8 हजार ICT शिक्षक पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत

राज्यात विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान अवगत व्हावे, या उद्देशाने आयसीटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या शिक्षकांची पुनर्नियुक्ती झालीच नाही. देशातील इतर राज्यांमध्ये आयसीटी शिक्षकांना पूर्णवेळ सेवेत कार्यरत करून घेतले आहे.

AI च्या युगात शाळांमधील संगणक लॅब बंद; 8 हजार  ICT शिक्षक पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence)अर्थात AI आणि डिजिटल युगात प्रत्येकाला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. परंतु,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education)राज्यभरातील शाळांमध्ये सुरू असलेल्या संगणक लॅब बंद (Computer lab closed)पाडण्याचा आणि विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळू नये, यासाठी आयसीटी (ICT)शिक्षकांची (ICT teacher)नियुक्ती न करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना संगणक असाक्षर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आयसीटी शिक्षक अस्वस्थ असून शासनाने विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देण्यासाठी आयसीटी शिक्षकांची पुनर्नियुक्ती करावी,अशी मागणी केली आहे. 

राज्यात विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान अवगत व्हावे, या उद्देशाने आयसीटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या शिक्षकांची पुनर्नियुक्ती झालीच नाही. देशातील इतर राज्यांमध्ये आयसीटी शिक्षकांना पूर्णवेळ सेवेत कार्यरत करून घेतले आहे. परंतु, महाराष्ट्रात मात्र शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या संगणक लॅब मध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

राज्यातील तब्बल आठ हजार ICT शिक्षक बेरोजगार आहेत. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग असताना विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देण्यासाठी शाळेत तज्ञ शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाला शाळेतून कोणती पिढी घडवायचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांपासून आयसीटी शिक्षकांच्या संघटनेने विविध मागण्या शासन स्तरावर मांडल्या. परंतु, त्यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही. आयसीटी विषय इयत्ता पाचवी पासून अनिवार्य करावा. माजी आयसीटी शिक्षकांना तात्काळ पुनर्नियुक्ती द्यावी. मंजूर आयसिटी विशेष शिक्षक पदावर कोणत्याही अटीशिवाय समावेश करावा. डिझेल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने तातडीने याबाबत आदेश जाहीर करावा, अशी मागणी मराठा नवक्रांती सेना शिक्षक आघाडीचे सचिव सचिन उकंडे यांनी केली आहे. 

----------------------------------

सध्या संगणकाचे युग असल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकाचे ज्ञान मिळणे गरजे आहे.शाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून संगणक लॅब उभारण्यात आल्या. परंतु, अनेक शाळांमध्ये या लॅब धूळ खात पडलेल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.देशात पंजाब, गोवा, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांनी ICT शिक्षकांना पूर्णवेळ सेवेत घेतले.मात्र, प्रगत राज्य म्हणत असताना आणि शिक्षण विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केलेला असताना महाराष्ट्र राज्य याबाबत लवकर निर्णय घेत असल्याचे दिसत नाही. ही शोकांतिका आहे. शासनाने याबाबत लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे द्यावेत. तसेच बेरोजगार शिक्षकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
- सचिन उकंडे, सचिव, मराठा नवक्रांती सेना, शिक्षक आघाडी