बीडच्या भूमिपुत्राचा युपीएससीत डंका... अभिजित पाखरे यांनी मिळवले यश..

या परीक्षेत अभिजित पाखरे यांनी ७२० रँक (720 Rank) मिळवली आहे.

बीडच्या भूमिपुत्राचा युपीएससीत डंका...  अभिजित पाखरे यांनी मिळवले  यश..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

युपीएससी २०२३ च्या (UPSC 2023 Result) नागरी सेवा परीक्षेचा (Civil Services Examination) निकाल जाहीर झाला. त्यात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या बीडच्या भूमीपुत्राने घवघवीत यश खेचून आणले आहे. या परीक्षेत अभिजित पाखरे (Abhijit Pakhere) यांनी ७२० रँक (720 Rank) मिळवली आहे. याआधी त्यांनी एमपीएससी आणि आता युपीएससी क्रॅक करत बीडचे भूमीपूत्र काशातच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. या यशानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

अभिजित पाखरे सध्या गडचिरोलीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कामावर असतानाच त्यांच्या कानी ही गोड बातमी आली. त्यामुळे त्यांचा आनंद आणखीन द्विगुणीत झाला. पारखे हे बीडच्या अतिदुर्गम भागातील शिरुर कासार तालुक्यातील पाडळी या छोट्याशा खेड्यातील आहेत. आई-वडील शिक्षण असल्याने घरात शिक्षणाचे वातावरण आणि त्यांची जिद्द या जोरावर त्यांनी हे यश संपादित केले आहे. 

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावी घेतल्यानंतर शिक्षणाची आवड असल्याने पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे पुणे शहर गाठले. उच्च शिक्षण पुर्ण झाले आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एमपीएससी मध्ये यश खेचून आणले. उपमुख्य  कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली. कामाची आवड आणि काही तरी वेगळे करण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांनी स्वतः प्रधान सचिवांना पत्र लिहून आदिवासीबहुल, अतिदुर्गम, नक्षलवादी म्हणून देशभर ओळख असलेल्या गडचिरोलीत पोस्टींग करुन घेतली.  

त्यानंतर त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नेमण्यात आले. मागील एक वर्षापासून ते या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. हे करत असताना त्यांनी २०२३ मध्ये युपीएससीची नागरी सेवा परीक्षा दिली होती. यामध्ये ते ७२० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

'एज्युवार्ता'शी बोलताना ते म्हणाले, माझे आई-वडील, गुरुजनांचे मार्गदर्शन, मित्र परिवाराचा पाठिंबा या तिन्ही गोष्टींमुळे मला हे यश मिळाले आहे. आपण स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना अनिश्चितता महत्ताची आहे. आपण प्रयत्न करत राहिलो तर एक ना  एक दिवस आपल्याला यश शंभर टक्के मिळते. पदाच्या माध्यमातून जनतेसाठी काम करायला खुप चांगली संधी मिळते.