शास्वत विकासासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रामीण भागाचा अभ्यास व्हावा : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रामीण विकास या पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन झाले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शास्वत विकासासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रामीण भागाचा अभ्यास व्हायला हवा. ग्रामीण जीवनातील माणसं, तिथल्या समस्या, नैसर्गिक साधनसंपत्ती, तिथली संस्कृती व पारंपरिक कौशल्ये यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून युवकांनी अभ्यास करायला हवा, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या गावचे सर्वेक्षण करून तयार केलेल्या 'शास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रामीण विकास' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी बोलत होते. या प्रसंगी प्र. कुलगुरू डॉ.पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, रविंद्र शिंगणापूरकर, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, प्रा. संदीप पालवे, डॉ. संगीता जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.
या पुस्तकामध्ये महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, पर्यावरण शास्त्र, पर्यटन, भूगोल, मानसशास्त्र, मराठी, वाणिज्य या विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील विविध घटकांचे सर्वेक्षण केले. तसेच त्याचे विश्लेषण करून अहवाल तयार करून त्याचे पुस्तकात केले. यामध्ये गावातील पाणी, प्राणी, वनस्पती, मृदा,शेती पध्दती, पर्यटन, पर्यावरण या घटकांचा अभ्यास केलेला आहे.
या प्रसंगी डॉ. शुभांगी औटी, डॉ. लतेश निकम, प्रा. अनिल जगताप, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समनव्यक डॉ. सविता कुलकर्णी, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख शुभांगी शिंदे, प्रा. नितीन लगड, डॉ वंदना सोनवले, डॉ जी.डी आवटे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नितीन घोरपडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी आणि आभार प्रदर्शन डॉ. लतेश निकम यांनी केले.