SPPU प्राध्यापक भरतीसाठी अर्ज केलेले तब्बल 6 हजार उमेदवार ठरणार अपात्र; काय आहे कारण?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे 111 जागांसाठी प्राप्त झालेल्या सुमारे 9 हजार अर्जांपैकी तब्बल 6 हजार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासन निर्णयानुसार केवळ 3 हजार उमेदवारांनीच 'एटीआर' सादर केलेला आहे. परिणामी अर्जात एटीआर न भरलेले उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेला शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे काही प्रमाणात गती मिळाली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांकडे रिक्त पदांवरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे 111 जागांसाठी प्राप्त झालेल्या सुमारे 9 हजार अर्जांपैकी तब्बल 6 हजार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासन निर्णयानुसार केवळ 3 हजार उमेदवारांनीच 'एटीआर' सादर केलेला आहे. परिणामी अर्जात एटीआर न भरलेले उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरणार आहेत, या वृत्ताला विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.
राज्य शासनाने राज्यातील विविध विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यासाठी मान्यता दिली. त्यातच राज्यपाल कार्यालयाने भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र अध्यादेश प्रसिद्ध केला. त्यात गुणवत्ता पूर्ण उमेदवारांची निवड व्हावी यासाठीचे नियम प्रसिद्ध केले. उमेदवारांचा एटीआर भरून घेण्याबाबत अध्यादेशामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला. 60, 20,20 गुणांनुसार भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे प्राप्त झालेल्या सुमारे 9 हजार अर्जांपैकी केवळ 3 हजार उमेदवारांनीच शासन निर्णयानुसार ऑनलाईन अर्जात एटीआर नमूद केला आहे. त्यामुळे तब्बल 6 हजार उमेदवारांचे अर्ज भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाणार आहेत.
राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशातील नियमांबाबत विविध संघटनांनी यापूर्वीच आक्षेप घेतले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार भरती प्रक्रिया राबविली जावी, अशी अपेक्षा आहे.
प्राध्यापक पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून प्रत्यक्ष पात्र उमेदवारांची यादी जाहीर करून, संबंधित उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवून आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासंदर्भातील मोठी प्रक्रिया या पुढील काळात राबवावी लागणार आहे. परंतु,अर्जांची छाननी करण्यासाठीच सुमारे दोन महिन्यांहून अधिक कालावधी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक पदाची भरती प्रक्रिया 2026-27 हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणार नाही, असे बोलले जात आहे.
-------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त जागांसाठी राबविल्या जात असलेल्या प्राध्यापक भरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधील सुमारे 50% उमेदवारांनी विहित मुदतीत सुधारित शासननिर्णयानुसार 'एटीआर' सादर केलेला नाही. त्यामुळे संबंधित उमेदवार भरती प्रक्रियेत अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-डॉ. प्रफुल पवार, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे