पुणे विद्यापीठ: भाषा भवन निकालाला विलंब; ३०० हून अधिक विद्यार्थी अडचणीत, थेट आंदोलनाचा इशारा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील प्रथम वर्ष मराठी व इंग्रजी विषयांच्या मे महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. परीक्षा संपल्यानंतर १०० दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही निकाल प्रलंबित आहेत. नियमानुसार निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर व्हायला हवेत, मात्र त्यात मोठा विलंब झाला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील प्रथम वर्ष मराठी व इंग्रजी विषयांच्या मे महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. परीक्षा संपल्यानंतर १०० दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही निकाल प्रलंबित आहेत. नियमानुसार निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर व्हायला हवेत, मात्र त्यात मोठा विलंब झाला आहे. यामुळे ३०० पेक्षा अधिक अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विद्यार्थ्यांनी येत्या १४ सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निकाल न आल्याने विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे कमवा व शिका योजना, विविध शिष्यवृत्ती, ग्रंथालय, वाचनालय, इंटरनेट आणि इतर शैक्षणिक सुविधा त्यांना उपलब्ध होत नाहीत. भाषा भवनातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, दलित, ओबीसी, आदिवासी आणि बहुजन समाजातून येतात. त्यांच्यासाठी कमवा व शिका योजना ही शिक्षण सुरू ठेवण्याची महत्त्वाची आर्थिक आधारव्यवस्था आहे. निकाल रखडल्याने ते या योजनेपासूनही वंचित राहिले आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने भाषा भवनातील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

जानेवारी २०२७ मध्ये विद्यापीठात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तसेच २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अशा परिस्थितीत भाषा, साहित्य आणि संस्कृती जपणाऱ्या विद्यापीठातच भाषा विषयांच्या विद्यार्थ्यांचे निकाल इतके दिवस प्रलंबित राहणे दुर्दैवी आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या दिरंगाईमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून प्रशासनाने तातडीने निकाल जाहीर करावेत, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अभिषेक शेलकर यांनी केली आहे.
मे २०२६ मध्ये प्रथम वर्षाची द्वितीय सत्र परीक्षा दिली, मात्र अद्याप निकाल आलेला नाही. त्यामुळे द्वितीय वर्षातील शैक्षणिक सुविधा, ग्रंथालय आणि वाचनालयाचा नियमित उपयोग करण्यात अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निकाल तातडीने जाहीर होणे आवश्यक आहे.
- साक्षी बनसोडे, विद्यार्थिनी