MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या; गळफास घेऊन संपवले जीवन

प्रथमेश याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती असून, आर्थिक अडचणीतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.प्रथमेश हा पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करीत होता.

MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या; गळफास घेऊन संपवले जीवन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एमपीएससी पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत मोठे आंदोलन केले. या घटनेला दोन दिवस पूर्ण होत नाहीत तोच पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रथमेश दिलीप देशमुख असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील खसापुरी-परंडा येथील रहिवाशी आहे.

प्रथमेशच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई आणि चार बहिणी आहेत. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा आधार हरपल्याने या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रथमेश याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती असून, आर्थिक अडचणीतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.प्रथमेश हा पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करीत होता. दोन दिवसांपूर्वी तो आपल्या मूळ गावी गेला होता. दरम्यान, मराठवाड्यातील दुष्काळामुळे सोयाबीनचे पीक जळून गेल्याने तो तणावात असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

दुष्काळामुळे शेतीचे नुकसान, नापिकी आणि त्यातच कर्जाचा वाढता बोजा यामुळे प्रथमेश मानसिक तणावाखाली होता. या सर्व परिस्थितीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत आहेत.
--------------------------------

प्रथमेशच्या मृत्यूवर केवळ श्रद्धांजली देऊन हा विषय संपणार नाही. जबाबदारी निश्चित करा, दोषींवर कारवाई करा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करा आणि विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करा. प्रथमेशच्या कुटुंबाला न्याय आणि भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांचे भविष्य हा कायदा-सुव्यवस्थेचा विषय नाही तो सरकारच्या जबाबदारीचा विषय आहे.प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे; उत्तर MPSC आणि सरकारनेच द्यायचे आहे!

अक्षय जैन, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस (प्रसारमाध्यम विभाग)

--------------------------------
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षांची तयारी करतात.मात्र, अलीकडच्या काळात झालेली पेपर फूटीची घटना विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक आहे.बहुतांश विद्यार्थी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आणि एकवेळ उपाशी राहून पुण्यात लहाशा खोल्यांमध्ये राहतात.आयोगाच्या परीक्षेवरील विश्वास ढासळला तर विद्यार्थी निश्चितच खचून जातील.त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले. प्रथमेशने असे टोकाचे पाऊल उचलणे नको होते.विद्यार्थ्यांनी खचून न जाता आत्मविश्वासाने आलेल्या आव्हानांना तोंड द्यायला हवे.
- किरण निंभोरे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलक