बालशिक्षण मंदिरच्या विद्यार्थ्यांनी साजरे केले पर्यावरणपूरक वृक्ष रक्षाबंधन

शाळेतर्फे आयोजित या उपक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालक, शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या उद्यानातील वृक्षांना बांधून ‘वृक्ष रक्षाबंधन’ केले.

बालशिक्षण मंदिरच्या विद्यार्थ्यांनी साजरे केले पर्यावरणपूरक वृक्ष रक्षाबंधन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 “वृक्ष आपले मित्र आहेत, त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे,” असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संभाजी उद्यान येथे सामाजिक व पर्यावरणपूरक रक्षाबंधन उत्साहात साजरे केले.

शाळेतर्फे आयोजित या उपक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालक, शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या उद्यानातील वृक्षांना बांधून ‘वृक्ष रक्षाबंधन’ केले. तसेच उद्यानातील कर्मचाऱ्यांनाही विद्यार्थ्यांनी प्रेमाने राख्या बांधून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांनी केले. यावेळी सौ. तनुजा सोनपाटकी यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. उपस्थित सर्वांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्गाशी असलेले आपले नाते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या पारंपरिक भावनेला पर्यावरण संवर्धनाची जोड दिली. “वृक्ष सजीवांना श्वास देतात, म्हणून त्यांचे रक्षण करूया,” हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला.

कार्यक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना खाऊ दिला. शाळेच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठीही खाऊची व्यवस्था करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि वृक्षसंवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा अभिनव उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.