पुणे महापालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७ जाहीर; ४० गुणवंत शिक्षकांचा होणार सन्मान
PMC शिक्षक पुरस्कार २०२६-२७ साठी ८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. पात्रता, ४० पुरस्कार, निवड निकष आणि ऑनलाइन अर्जाबाबतची माहिती तपासा.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ जाहीर केला आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले. या पुरस्कारासाठी मंगळवार, दिनांक ८ सप्टेंबरपासून ऑनलाइन प्रस्ताव स्वीकारले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर आहे. महापालिका तसेच अनुदानित खासगी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व माध्यमांच्या पात्र शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल, असे त्यांनी जाहीर केले.
यंदा एकूण ४० शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील २५, माध्यमिक शाळांतील पाच, अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पाच आणि अनुदानित खासगी माध्यमिक शाळांतील पाच शिक्षकांचा समावेश असेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि गुणवत्ताधिष्ठित ठेवण्यात आली आहे. राज्य शासनाच्या १६ जुलै २०२५ रोजीच्या शिक्षक गुणगौरव पुरस्कारासंदर्भातील शासन निर्णयाशी सुसंगत निकष निश्चित करण्यात आले आहेत.
प्राप्त प्रस्तावांचे एकूण १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी दिलेले योगदान तसेच अन्य उल्लेखनीय कामगिरी या बाबींचा मूल्यांकनात विशेष विचार केला जाईल. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी पुणे महापालिकेचे महापौर असतील. समितीकडून निर्धारित निकषांनुसार छाननी आणि मूल्यांकन करून गुणवंत शिक्षकांची अंतिम निवड केली जाणार आहे.
निवड झालेल्या शिक्षकांना लॅपटॉप, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचा मुख्य उद्देश शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे तसेच इतर शिक्षकांना गुणवत्तापूर्ण, नावीन्यपूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणा देणे हा आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने पात्र आणि इच्छुक शिक्षकांना ८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढण्यास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.