पुण्यातील चिमुकल्यांची राज ठाकरेंना ८०० पत्रांतून आर्त हाक : आमची मराठी शाळा पाडली, मदत करा

पुण्यातील मराठी माध्यमाची 'शिवराज विद्या मंदिर' ही शाळा पाडल्यानंतर, ती पुन्हा उभारण्यासाठी मदत करावी, अशी विनंती ८०० विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांना हस्तलिखित पत्रांद्वारे केली आहे.

पुण्यातील चिमुकल्यांची राज ठाकरेंना ८०० पत्रांतून आर्त हाक : आमची मराठी शाळा पाडली, मदत करा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील वडगाव शेरी येथील सोमनाथनगर परिसरातील सुमारे चाळीस वर्षे जुनी शिवराज विद्या मंदिर ही मराठी माध्यम शाळा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी पाडून टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आर्त हाक दिली आहे. शाळा पाडल्यानंतर सुमारे वीस दिवसांनी या शाळेतील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते लिहिलेली तब्बल आठशे पत्रे राज ठाकरे यांना पाठवली आहेत. ‘आमची मराठी शाळा पाडलीय, आम्हाला याच शाळेत शिकायचे आहे, आम्हाला मदत करा’ अशा भावनिक शब्दांत ही पत्रे लिहिली असून अनेक विद्यार्थ्यांनी पाडलेल्या शाळेचे चित्रही पत्रांसोबत जोडले आहे.

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या भूमिकेसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे यांच्याकडेच विद्यार्थी आणि संस्थेने आशा ठेवली आहे. १७ डिसेंबर २०१६ रोजी राज ठाकरे यांच्या हस्तेच मनसेतर्फे या शाळेतील प्रयोगशाळा आणि संगणक विभागाचे उद्घाटन झाले होते. त्याच स्मृतीच्या आधारे संस्थेच्या सचिव गीता साळुंखे यांनी सांगितले की, “तेच आमच्या शाळेसाठी नक्की धावून येतील या विश्वासातून आम्ही आठशे पत्रे पाठवली आहेत.

”पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढत असताना गरीब मराठी मुलांसाठी असलेली ही शाळा अशा पद्धतीने पाडली जाणे म्हणजे मराठी माणसाने न्यायासाठी कुठे जायचे, असा प्रश्न गीता साळुंखे यांनी उपस्थित केला आहे. पालक आणि शिक्षकांनीही राज ठाकरेच आता न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. एज्युवार्ता न्यूज नेटवर्कच्या माहितीनुसार, ही पत्रे विद्यार्थ्यांच्या भावनिक आवाहनाचे प्रतीक ठरली आहेत.

मराठी शिक्षणाच्या हक्कासाठी लढणारे राज ठाकरे यांच्याकडे आता या चिमुकल्यांची अपेक्षा आहे की त्यांची शाळा पुन्हा उभी राहील आणि त्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता येईल. या घटनेने मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.