वर्ल्ड उद्योजकता मानांकनात मुंबई विद्यापीठाची झेप; जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा सन्मान 

उद्योजकांसाठीच्या 'पिचबुक'च्या २०२६ च्या जागतिक क्रमवारीत मुंबई विद्यापीठ ७४ व्या स्थानावर आहे; या विद्यापीठाशी संबंधित ३३९ संस्थापकांनी १२.९ अब्ज डॉलर्सचा निधी उभारला आहे.

वर्ल्ड उद्योजकता मानांकनात मुंबई विद्यापीठाची झेप; जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा सन्मान 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जागतिक उद्योजकता परिसंस्थेत मुंबई विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘पिचबुक’च्या २०२६ मधील ‘टॉप १०० युनिव्हर्सिटीज फॉर एन्त्रप्रेन्योर्स’ या क्रमवारीत विद्यापीठाला ७४वे स्थान मिळाले आहे. या यादीत स्थान मिळविणाऱ्या भारतातील आठ उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश असून, महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ म्हणून त्याने हा मान पटकावला आहे. ही क्रमवारी १ जानेवारी २०१५ ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उद्यम भांडवल उभारणाऱ्या कंपन्यांच्या संस्थापकांच्या आधारे तयार करण्यात आली आहे.

जगभरातील दोन लाख २२ हजारांहून अधिक उद्यम-समर्थित संस्थापकांच्या शैक्षणिक पार्श्वभूमी आणि गुंतवणूकविषयक माहितीचे विश्लेषण करून ही जागतिक क्रमवारी निश्चित करण्यात आली. भारतातील अव्वल संस्थांमध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, दिल्ली विद्यापीठ, बिट्स पिलानी आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाशी संबंधित ३३९ संस्थापकांनी ३१६ कंपन्यांची उभारणी केली असून, या कंपन्यांनी एकूण १२.९ अब्ज अमेरिकी डॉलरचे भांडवल उभारले आहे.

माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांची संख्या आणि त्यांना मिळालेल्या उद्यम भांडवलाच्या आधारे ही क्रमवारी तयार करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ७४व्या स्थानाने विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय क्षमतेची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. ३३९ संस्थापक, ३१६ कंपन्या आणि १२.९ अब्ज डॉलरचे भांडवल ही केवळ आकडेवारी नसून, विद्यापीठातून घडलेल्या प्रतिभेने निर्माण केलेल्या जागतिक प्रभावाचे प्रतीक आहे.

हे स्थान विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय सामर्थ्याची जागतिक पावती आहे. नवीन कल्पनांना उद्योगात रूपांतरित करून विद्यार्थ्यांना केवळ नोकरी शोधणारे न ठेवता रोजगार निर्माते बनविण्यासाठी विद्यापीठ उद्योजकता परिसंस्था अधिक सक्षम करत आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख आणखी मजबूत झाली आहे, असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.