दहावी- बारावी परीक्षा शुल्क वाढीला शिक्षक, मुख्याध्यापक संघाचा विरोध
राज्य मंडळांने कागद वाचूवून कोट्यावधी रुपयांचा खर्च कमी केला आहे, असे असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात वाढ करणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळातर्फे नुकताच जाहीर करण्यात आला. येत्या जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांपासून ही शुल्क वाढ लागू असणार आहे. मात्र, विविध विद्यार्थी संघटनानंतर आता मुख्याध्यापक व शिक्षक संघटनेने सुद्धा या शुल्कवाढीला विरोध दर्शविला आहे.
राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. तसेच शुल्क वाढ केली तरच शिक्षकांना त्या मोबदल्यात उत्तर पत्रिका तपासण्याचे मानधन वाढवून दिले जाते. राज्य मंडळांने कागद वाचूवून कोट्यावधी रुपयांचा खर्च कमी केला आहे, असे असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात वाढ करणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
राज्य शासनाकडून शुल्क वाढीला मान्यता मिळाल्याशिवाय राज्य मंडळाकडून शुल्कवाढीचा निर्णय घेतला जात नाही.त्यामुळे केवळ बोर्डाचा नाही तर शासनाचा सुध्दा शुल्क वाढीला पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने शुल्कवाढीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
------------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात केलेल्या शुल्क वाढीला मुख्याध्यापक संघाचा विरोध आहे. अचानक केलेली शुल्कवाढ योग्य नाही. येत्या सोमवारी मुख्याध्यापक संघातर्फे याबाबत शिक्षण मंडळाला सविस्तर निवेदन दिले जाणार आहे.
- नंदकूमार सागर, सचिव, मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य
--------------
विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काच्या मोबदल्यात राज्य मंडळ विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा देत नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे, त्यांना हॉल तिकीटाच्या प्रिंट आऊट काढून देणे, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुण भरणे, ही सर्व कामे शाळा व शिक्षकांकडून केली जातात. त्यामुळे राज्य मंडळाकडून करण्यात आलेली शूलवाढ ही अन्यायकारक आहे.
- विक्रम काळे, सचिव,कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना