मुंबई विद्यापीठ : सीडीओई बीकॉम, बीए निकालात ८० टक्के विद्यार्थी नापास; गडबड झाल्याचा आरोप
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राने (सीडीओई) जाहीर केलेल्या प्रथम वर्ष बीकॉम आणि बीएच्या निकालात गडबड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राने (Distance and Online Learning Center) (सीडीओई) जाहीर केलेल्या प्रथम वर्ष बीकॉम (First Year B.Com) आणि बीएच्या निकालात गडबड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थी (80 percent failed) नापास झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बहुतांश विद्यार्थी नोकरी करत शिक्षण घेत असल्याने परीक्षा आणि निकालातील विलंब किंवा प्रक्रियेतील गोंधळाचा त्यांच्या करिअरवर परिणाम (Impact on career) होण्याची शक्यता विद्यार्थ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
बीकॉमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेला २ हजार ५४३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, फक्त ४५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे बीएच्या पहिल्या सत्राची परीक्षा २ हजार २२४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील १ हजार ७६४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, केवळ ४६० विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या आकड्यांमुळे निकालात गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात आहे.
एका किंवा अधिक विषयांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्यास त्यांना अनुत्तीर्ण असा शेरा दिला जात आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात प्रवेश दिला जात आहे. प्रथम वर्षातील सर्व एटीकेटी प्रलंबित असतानाही पुढील वर्षात विद्यार्थ्याला प्रवेश देण्याची तरतूद असल्याने विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नसून, एटीकेटीच्या परीक्षा २५ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत, असेही सांगण्यात आले.
सीडीओईमधील या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असले तरी, निकालातील उच्च अनुत्तीर्ण दराबाबत अधिक तपशीलवार चौकशीची मागणी होत आहे. विद्यार्थी आपल्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत असून, विद्यापीठाने प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.