राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शासकीय शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शासकीय शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला. या करारानुसार विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत पुरविण्यात येणार आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेला थेट मदत करणारा आहे, कारण स्पष्ट दृष्टीशिवाय अभ्यास प्रभावी होऊ शकत नाही, असे शिक्षण विभागाचे मत आहे.
शालेय शिक्षण विभाग प्रकल्पाची अंमलबजावणी करेल, तर रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट अंमलबजावणी भागीदार आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून काम करेल. दृष्टीदोष असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्याची जबाबदारीही फाउंडेशनकडे राहील. कराराचा कालावधी ३६ महिन्यांचा असून या काळात राज्यभर डोळे तपासणी शिबिरे आयोजित केली जातील. प्रगतीचे नियमित परीक्षण व मूल्यमापन होईल आणि त्रैमासिक अहवालाद्वारे तपासणी शिबिरे, लाभार्थी संख्या व चष्मा वितरण यांचा आढावा घेतला जाईल. शैक्षणिक दृष्टिकोनातून हा प्रकल्प विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्ये अधिक सक्रिय व लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करणार असल्याच्या अशा व्यक्त करण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी वैज्ञानिक पद्धतीने माहिती संकलित केली जाईल. वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि डेटा संरक्षणाला करारामध्ये विशेष महत्त्व दिले आहे. यापूर्वी या उपक्रमाद्वारे १८ जिल्ह्यांतील ८०० शाळांमधील ६ लाख ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी झाली असून ६३ हजारांहून अधिक चष्मे वितरित करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या यशामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडथळे कमी झाले आहेत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात विस्तारित उपक्रम अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आजारांचे व तक्रारींचे वेळेत निदान होऊन उपचार शक्य होईल. परिणामी त्यांची शैक्षणिक प्रगती सुधारेल आणि एकूण शिकण्याचा अनुभव चांगला होईल. हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या एकत्रित विकासासाठी महत्त्वाचा ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.