MPSC अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलाचा इशारा; पेपर फुटीवर रोहित पवार आक्रमक

प्रश्नपत्रिका फुटल्याची खात्री पटल्यानंतर MPSC ने महाराष्ट्र FDA भरती परीक्षा रद्द केली आहे. रोहित पवार यांनी MPSC अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, १ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

MPSC अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलाचा इशारा; पेपर फुटीवर रोहित पवार आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेत फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले असून एकाच उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचा आणि तिचा गैरवापर केल्याचा पुरावा समोर आला आहे. या निर्णयामुळे पेपरफुटीविरुद्ध लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात सर्वात प्रथम आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत, अन्यथा १ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा कडक इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

“शेतकरी कुटुंबातील अनेक मुले-मुली इथे आहेत. सोयाबीनचे भाव वाढले का? महागाई वाढतच आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे आणि त्यांची मुले शिकायला येतात, पण पेपर फोडले जातात. आई-वडील उसने पैसे घेऊन शिक्षणासाठी खर्च करतात. त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही काम करतो. मी जेव्हा बोलतो तेव्हा पुरावे असतानाच बोलतो. आवाज उठवल्यावर मला जेलची धमकी दिली जाते. सतत पेपर फुटत आहेत,” असे रोहित पवार म्हणाले. जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क, तलाठी, एफडीए, एसआरपीआर अशा अनेक परीक्षा फुटल्याची आठवण त्यांनी करून दिली.

एमएमआरडीए पेपरफुटीबाबत त्यांनी एकनाथ शिंदे यांना भेट दिल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांना घाबरू नका, सत्य बाहेर काढा, असे आवाहनही त्यांनी केले. एफडीएचा पेपर कसा फुटला हे सर्वांना माहीत आहे, असे सांगत त्यांनी अल्टिमेटम दिला होता. सुरुवातीला नकार देणारे आयोग आता पेपरफूट मान्य करून परीक्षा रद्द करत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले.

एमपीएससी अध्यक्ष मोठ्या नेत्यांचे मित्र असल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, आरटीओ आयुक्तांची भूमिका बजावताना त्यांनी मोठा गोंधळ घातला होता. अशा अधिकाऱ्याला अध्यक्ष बनवणे अमान्य आहे. अध्यक्ष व सचिव यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अन्यथा एक तारखेला आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

सतत होणाऱ्या पेपरफुटींमुळे विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे. रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून आयोगाकडून तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.