बीएलओसाठी नियुक्त शिक्षकांना 'अर्जित रजा' मिळणार, सेवा पुस्तिकेत अर्जित रजेची नोंद; प्रस्ताव सादर
शिक्षण विभागाने मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवल्यामुळे, उन्हाळी सुट्टीत जनगणना आणि बीएलओ ड्युटी करणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षकांना 'अर्जित रजा' मिळण्याची शक्यता आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जनगणना व बीएलओच्या कामासाठी राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित शाळांमधील शिक्षकांची मे महिन्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मे महिन्याची सुट्टी शिक्षकांची हक्काची असते. मात्र, या कामामुळे ती वाया गेली. त्यामुळे शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. मात्र, उन्हाळी सुट्टीत जनगणनेचे व बीएलओचे काम केलेल्या शिक्षकांना त्या मोबदल्यात 'अर्जित रजा' देऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालकांनी प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास शिक्षकांना त्यांच्या हक्काची रजा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ अन्वये सुट्टी काळात काम केल्यास शिक्षकांना अर्जित रजा देता येते. तसेच या अर्जित रजेची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत करता येते. तथापि अनेक शाळांमध्ये या रजा सेवा पुस्तिकेमध्ये मांडल्या जात नाही. परिणामी, शिक्षकांना या बदली रजांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येतात. यंदा मे महिन्यांमध्ये शिक्षकांच्या हक्काची सुट्टी असताना त्यांना जनगणना व बीएलओच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या सुट्टीपासून वंचित राहावे लागले.

उन्हाळी, हिवाळी सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांनी काम केल्यास त्यांच्या सेवा पुस्तिकेत त्याची नोंद करता येते. अशा कामासाठी 'अर्जित रजा' मिळण्याचा अधिकार असतो. काम पूर्ण केल्यावर सेवा पुस्तकात या कालावधीची नोंद करणे अनिवार्य आहे. सुट्टीच्या काळात काम केल्यास, जितके दिवस काम केले, त्या प्रमाणात अर्जित रजा शिक्षकांच्या खात्यात जमा केली जाते. त्याची नोंद सेवा पुस्तिकेत केली जात असल्याची बाब शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे व शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर तसेच शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांच्या निदर्शनास आणून दिली.
त्याची दखल घेत शिक्षण संचालकांनी उन्हाळी सुटीमध्ये काम केलेल्या शिक्षकांना अर्जित रजा मिळावी, तसेच त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये करण्यात यावी, यासंदर्भात मान्यता मिळविण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास शिक्षकांना त्यांच्या हक्काची रजा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.