MPSC कडून अखेर परीक्षा रद्द! औषध निरीक्षक भरतीची फेरपरीक्षा होणार 

परीक्षेत कथित अनियमितता आढळल्यामुळे MPSC ने 'ड्रग इन्स्पेक्टर' (औषध निरीक्षक) पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. यासाठी पुन्हा अर्ज किंवा शुल्क न घेता फेरपरीक्षा घेतली जाईल.

MPSC कडून अखेर परीक्षा रद्द! औषध निरीक्षक भरतीची फेरपरीक्षा होणार 
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींनंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आयोगाने परीक्षेची गोपनीयता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राखण्यासाठी तसेच उमेदवारांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी ही कठोर पाऊल उचलली आहे.
एमपीएससीने २९ जुलै २०२५ रोजी औषध निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला आणि ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलैदरम्यान पूर्ण झाल्या. त्यानंतर ४८५ पात्र व तीन अपात्र अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

मात्र, २२ ते २६ जुलैदरम्यान आयोगाला चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारींनुसार परीक्षेच्या दोन दिवस आधी, म्हणजे २० मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाले आणि ते सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित झाल्याचा दावा करण्यात आला. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने २७ जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे चौकशीसाठी तक्रार दाखल केली. गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालानुसार एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.
या सर्व बाबींमुळे आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची निष्पक्षता आणि उमेदवारांचा विश्वास कायम राहावा, यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आता औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
फेरपरीक्षेची तारीख आणि इतर तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे लवकरच जाहीर करण्यात येतील. या निर्णयामुळे हजारो उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार असून, निष्पक्ष परीक्षाप्रक्रियेवर भर देण्यात आला आहे. उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवावे.