"खाऊन-पिऊन आंदोलन करा...", मंत्री झिरवळांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाची थट्टा; विद्यार्थ्यांनी जागेवरच सुनावलं

पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे १४ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अद्यापही चालूच आहे; दरम्यान, मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. झिरवाळ यांच्या एका विधानामुळे आंदोलकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

"खाऊन-पिऊन आंदोलन करा...", मंत्री झिरवळांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाची थट्टा; विद्यार्थ्यांनी जागेवरच सुनावलं

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील मांजरी येथे गेल्या चौदा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. हजारो विद्यार्थी यात सहभागी असून काही विद्यार्थी आमरण उपोषणावर बसले आहेत. उपोषणामुळे काहींची प्रकृती खालावली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी मागण्यांबाबत ठोस लेखी आश्वासन मागितले. मात्र सरकारने तांत्रिक बाबींसाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र मंञी झिरवळ यांच्या खाऊन-पिऊन आंदोलन करा, या  अजब सल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. 

चर्चेदरम्यान मंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “तुम्ही खाऊन-पिऊन आंदोलन करा. मी जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा चोरून खात असे आणि आंदोलन करत असे.” या अजब सल्ल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला. आंदोलक विद्यार्थ्यांनी तात्काळ पलटवार करत सांगितले की, “आम्ही खाऊन-पिऊन आंदोलन करायचे असते तर तुम्ही इथे आलाच नसता.” विद्यार्थ्यांनी या वक्तव्याला उपोषणाची थट्टा ठरवले आणि आंदोलनाच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला.

अशोक उईके यांनी पंधरा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत पाच तास चर्चा केली. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत असल्याचे सांगण्यात आले. तरीही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, लेखी शासन निर्णय किंवा मागण्या मान्य झाल्याचे आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. दोन दिवसांची मुदत मिळाली असली तरी त्यांच्या मागण्यांवर लेखी हमी अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

एका बाजूला सरकार चर्चा सुरू ठेवत असताना दुसऱ्या बाजूला झिरवळांच्या वक्तव्याने वातावरण तापले आहे. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असताना अशा प्रकारचा सल्ला देणे आंदोलनाची खिल्ली उडवणे ठरते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली असून आता सरकार दोन दिवसांत काय निर्णय घेते आणि लेखी आश्वासन देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.