तुझा टीसी देत नाही युनिव्हर्सिटीत जा ; रत्नदीप कॉलेजची अरेरावी; विद्यापीठाने विद्यार्थी सोडले वाऱ्यावर....

तुझा टीसी देत नाही युनिव्हर्सिटीत जा ; रत्नदीप कॉलेजची अरेरावी; विद्यापीठाने विद्यार्थी सोडले वाऱ्यावर....

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या जामखेड तालुक्यातील रत्नदीप कॉलेजचे (Ratnadeep College jamkhed)संलग्निकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी (बाटू लोणेरे) नाशिक येथील आरोग्य विज्ञान महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्सेस यांनी रद्द केले. मात्र, असे असताना केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai phule Pune University) संलग्निकरण काही अटींच्या अधीन राहून कायम ठेवले असल्याचा आरोप विद्यार्थी व विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच विद्यार्थ्यांना दाखले व इतर कागदपत्र देण्यास महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना अरेरावीची भाषा वापरली जात आहे.'टीसी पाहिजे असेल तर विद्यापीठात जा, तुझा टीसी देणार नाही' असे शब्द वापरून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरूनच हाकलून दिले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. महाविद्यालयात कोणत्याही सुविधा नसल्याचे स्पष्टपणे आढळून आले. एकाच इमारतीत अनेक अभ्यासक्रम चालवले जात असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांना ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सोडून जाण्याची मागणी केली. त्यावर बरीच खलबते मात्र,दोन दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून आवश्यक कागदपत्रे घेऊन विद्यापीठाने जाहीर केलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा,असे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना कागदपत्र देताना महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही अडवणूक करू नये,असेही स्पष्ट निर्देश विद्यापीठाने दिले. परंतु, शुल्क प्रलंबित असल्याचे कारण सांगून कागदपत्र देण्यास महाविद्यालय प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. 

व्हिडिओ पहा :


विद्यापीठाने रत्नदीप कॉलेजच्या चौकशीसाठी पाठवलेल्या समितीने महाविद्यालय विरोधात अत्यंत तीव्र अशा स्वरूपाचा अहवाल सादर केला होता. महाविद्यालयात प्राध्यापक, प्राचार्य , आत्याधुनिक लॅब, परीक्षा अधिकारी नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले होते. कॉलेजकडून विविध प्रकारच्या हेडखाली विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क आकारून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची पोहज पावती दिली जात नाही, बस वापरणे, वसतिगृह ,ड्रेस कोड, जनरल फी, इंडस्ट्रियल व्हिजिट फी, इंडस्ट्रियल ट्रेनिंग सर्टिफिकेट फी, वार्षिक स्नेहसंमेलन फी अशा वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क महाविद्यालयाकडून आकारण्यात आले.मुलांचे कागदपत्र परत करताना त्यांच्याकडून अवास्तव फी वसूल केली जात आहे, अशा स्वरूपाचा अहवाल विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीने विद्यापीठाकडे सादर केला होता. त्यातच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून तसेच वित्त विभागाकडून महाविद्यालयाची चौकशी करणे आवश्यक असल्याची शिफारस समितीने केली होती. परंतु, विद्यापीठाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे समितीच्या सदस्यांकडून अत्यंत खेदाने सांगितले जात आहे.

----------------

विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, ही बाब विद्यापीठाच्या समितीच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे समितीने विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काही तांत्रिक बाबी बाबत महाविद्यालयात विद्यापीठाने एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी शिफारस केली होती. मात्र अद्याप विद्यापीठाने या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे विद्यापीठाने या आम्हाला वाऱ्यावर सोडले असल्याचे भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून त्रास दिला जाईल या भीतीने विद्यार्थी नाव जाहीर करण्यास समोर येत नाहीत.