बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांवर सर्व संघटनांचा बहिष्कार 

इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षा या परीक्षा केंद्रातील केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक व शिक्षकेतर यंत्रणात बदल करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांवर सर्व संघटनांचा बहिष्कार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षा (10th and 12th standard exams) या परीक्षा केंद्रातील केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक व शिक्षकेतर यंत्रणात बदल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, या निर्णयामुळे शिक्षकांवरील विश्वास समाजामध्ये कमी होत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा अन्यथा परीक्षा प्रक्रिया व पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समिती व सर्व शैक्षणिक संघटनांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाला पत्राद्वारे दिला आहे.दरम्यान, शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या सहविचार सभेत त्यावर सकारात्मक चर्चा झाली असून त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

कॉपीमुक्त अभियानात काही बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक तसेच परीक्षक यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे दिसते. कॉपीमुक्त अभियानाबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या दुसर्‍या सुचनेत, परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत. त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.परंतु, याबाबत शिक्षकांच्या विविध संघटनांतून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यातील त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिका थ्री लेअर पॅकिंगमध्ये येतात. सर्व सह्या झाल्यावर विद्यार्थ्यांसमोर त्या उघडतात. यावेळी वर्गात किमान पाच सहा शाळांचे विद्यार्थी असतात. वर्गावर उपकेंद्र संचालक आणि केंद्र संचालक यांच्या एकूण चार-पाच फेऱ्या होतात. पेपर लेखन पूर्णपणे सर्व वर्गासमोर व्यवस्थित होत असताना शिक्षकांवर हा अविश्वास दाखवणे आवश्यक आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पेपरच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षक पेपरच्या दिवशी शाळेत जे अध्यापन करतात ते करणे शक्य होणार नाही. शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करता पेपरच्या दिवशी शाळा चालविणे अवघड होईल. त्यामुळे बोर्डाने कॉपी मुक्त अभियानासाठी इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

---------------------------------

राज्य मंडळाबरोबर झालेल्या सहाविचार सभेत संघटनांच्या मागण्या शासनाकडे सादर करण्याचे मान्य करण्यात आले आहे.मात्र, शासनाकडून मागण्यांची पूर्तता न झाल्यास सर्व संघटनांनी शिक्षकांवर दाखवलेल्या अविश्वासामुळे दहावी- बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्यक्षात परीक्षा घेणे आणि दरम्यानच्या काळात शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणे हे शाळा व परीक्षा केंद्र यातील अंतरांमुळे शक्य होणार नाही. परिणामी दीड महिना शाळेचे काम बंद पडेल.त्यामुळे शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा,यासाठी राज्य मंडळाला सर्व संघटनांतर्फे निवेदन देण्यात आले आहे. 

- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य