निवृत्त शिक्षकांच्या भरतीला विरोध; शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंनी स्पष्टच सांगितलं...
मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षण आयुक्तांना निवृत्त शिक्षकांच्या भरतीबाबत नुकतेच निवेदन दिले आहे. अध्यक्ष जे. के. पाटील, उपाध्यक्ष व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सचिव शांताराम पोखरकर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण विभागाने (Education Department) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये (ZP Schools) कंत्राटी तत्वावर निवृत्त शिक्षकांची भरती (Teachers Recruitment) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने विरोध केला आहे. तसेच अनेक बेरोजगार तरुणांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यावर शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असून शिक्षक भरतीत त्याचा कोणताही अडसर येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षण आयुक्तांना निवृत्त शिक्षकांच्या भरतीबाबत नुकतेच निवेदन दिले आहे. अध्यक्ष जे. के. पाटील, उपाध्यक्ष व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सचिव शांताराम पोखरकर यांच्या निवेदनावर सह्या आहेत. मानधन तत्वावर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याऐवजी बेरोजगार प्रशिक्षित झालेल्या व पात्रता असलेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात संधी देण्यात यावी, अशी मागणी महामंडळाकडून करण्यात आली आहे.
5th and 8th Scholarship Result 2023 : पाचवी,आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
रिक्त असलेल्या जागांवर नेमणूक करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. याने सुशिक्षित प्रशिक्षित शिक्षकांची बेकारी कमी होऊन राज्यातील शैक्षमिक वातावरण चांगले होण्यास मदत होईल, असेही निवदेनात म्हटले आहे. मुख्याध्यापकांच्या या भूमिकेप्रमाणेच अनेक बेरोजगार इच्छूक तरुणांनीही या भरतीवर आक्षेप घेतला आहे. प्रशिक्षित तरुण बेरोजगार असताना निवृत्त शिक्षकांचीच पुन्हा भरती करणे तरुणांवर अन्यायकारक असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. या तरुणांना संधी देण्याची मागणी होत आहे.
यावर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरता हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येत आहेत. नवीन शिक्षण भरतीमध्ये कोणताही अडसर होणार नाही या दृष्टीने सध्या तात्पुरत्या स्वरुपात ही सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यात येत आहे. मूळ भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच या नियुक्त्या राहणार असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले.
टीईटीचा रखडलेला निकाल जाहीर करणे, टीएआयटी गुणवत्तेवर आधारित निर्विघ्नपणे पार पाडणे, वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल असलेल्या दाव्यांमध्ये बाजू मांडून ते स्थगनादेश उठून घेणे आणि आता रोस्टर मधील अनेक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे या सगळ्या प्रक्रिया शासनाने प्रशासनाने जोरकसपणे केल्या असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD