पुणे विद्यापीठाने समाजासाठी काय भरीव संशोधन केले? मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० शैक्षणिक संस्थांनी समाज उपयोगी संशोधन करावे. त्या संदर्भात उच्च शिक्षण विभागातर्फे लवकरच अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाने समाजासाठी काय भरीव संशोधन केले? मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने समाजासाठी काय भरीव संशोधन केले? असा सवाल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० शैक्षणिक संस्थांनी समाज उपयोगी संशोधन करावे. त्या संदर्भात उच्च शिक्षण विभागातर्फे लवकरच अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमटिक्सच्या नवीन इमारत व संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमास डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, सोसायटीचे कार्यवाह प्रा. आनंद काटीकर, डॉ. तुषार देशमुख आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असल्यास संशोधन, उत्तम प्रशिक्षण आणि आपण कशासाठी काम करीत आहोत याची स्पष्ट दिशा या तीन बाबींवर विशेष भर द्यावा लागेल. डीईएस पुणे विद्यापीठाने संशोधनाला केंद्रस्थानी ठेवून वाटचाल सुरू केली असून समाजाभिमुख प्रकल्पांनाही प्राधान्य दिले आहे. संशोधनाला अधिक बळ देण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील संशोधन प्रकल्पांना प्रभावी मार्गदर्शन मिळणे आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकार सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

गणितामुळे विचारशक्ती, तर्कशक्ती, कल्पनाशक्ती आणि नमुन्यांची ओळख करण्याची क्षमता विकसित होते. मात्र, शालेय शिक्षणातील गणिताची पातळी घसरत असल्याचे चित्र चिंताजनक आहे, असे नमूद करून डॉ. माशेलकर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), नवोन्मेष आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ ज्ञान शिकवणे पुरेसे नाही, तर नव्या ज्ञानाची निर्मिती करणारी विद्यापीठे उभी राहणे ही काळाची गरज आहे. भारताला जागतिक नेतृत्व मिळवायचे असेल, तर ज्ञानाचे ग्राहक नव्हे तर ज्ञानाचे निर्माते बनावे लागेल. "जग झपाट्याने बदलत असून तंत्रज्ञानात सातत्याने नावीन्यपूर्ण बदल होत आहेत. अशा परिस्थितीत विद्यापीठांनी संशोधन आणि नवोन्मेषाला केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षण देणे आवश्यक आहे. 

माशेलकर म्हणाले, विज्ञान आणि समाजशास्त्र शाखांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा, नावीन्यपूर्ण संशोधन करण्याचा आणि समाजाभिमुख प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे  अपयशाला घाबरू नका, प्रश्न विचारत राहा. नव्या पिढीनेच देशाचे भविष्य घडवायचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांच्या संगमातून भारत जागतिक महासत्ता बनेल.