"पेपर लीक करणारे गुन्हेगार मोकाट, विद्यार्थ्यांना रस्त्यावर तुढवता;" राहुल गांधी यांची पंतप्रधान युवक-विरोधी असल्याची टीका

देशात आतापर्यंत १५२ पेपर लीक झाले असून ७.५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. तरीही एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही. उलट, रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना लाठ्यांचा मार बसत आहे. प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना उत्तराऐवजी पोलिसांच्या लाठ्या मिळत असल्याच्या भावना राहुल गांधींनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत

"पेपर लीक करणारे गुन्हेगार मोकाट, विद्यार्थ्यांना रस्त्यावर तुढवता;" राहुल गांधी यांची पंतप्रधान  युवक-विरोधी असल्याची टीका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेपर लीक करणारे गुन्हेगार मोकाट फिरत असताना देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर ओढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनात पेपर लीक, (NEET paper leak) शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ यासारख्या मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरण्यात आले. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना देशाच्या इतिहासातील सर्वात युवक-विरोधी पंतप्रधान असल्याची टीका केली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा (Demand for Dharmendra Pradhan's resignation) घेण्यातही सरकार अपयशी ठरल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

देशात आतापर्यंत १५२ पेपर लीक झाले असून ७.५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे. तरीही एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही. उलट, रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना लाठ्यांचा मार बसत आहे. प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना उत्तराऐवजी पोलिसांच्या लाठ्या मिळत असल्याच्या भावना राहुल गांधींनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. पेपर लीक करणारे गुन्हेगार मोकाट फिरत असताना देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर ओढले जात असल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी केला. हे सरकार तरुणांना अपयशी ठरवत नसून त्यांच्यावरच तुटून पडत असल्याचे मत व्यक्त केले.

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनीही या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर निशाणा साधला. NEET पेपर लीक, परीक्षा रद्द करणे आणि आता Re-NEET मधील गडबडी यासारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याऐवजी सरकारने स्वतःच्या अपयशी धोरणांचा आढावा घ्यावा, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. पंतप्रधान मोदींनी स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवल्याचे सांगितले होते, तरीही वारंवार अशा घटना घडत असल्याचे प्रश्न उपस्थित केले. संसदेत सविस्तर चर्चा करून कोट्यवधी तरुणांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, CJP च्या प्रतिनिधीमंडळाने केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडल्या. मात्र, बैठकीनंतर आंदोलकांनी स्पष्ट केले की, सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी जाहीर केले. दुसरीकडे, जे. पी. नड्डा यांनी सोशल मीडियावर बैठकीचे फोटो शेअर करत सकारात्मक चर्चेचा दावा केला आहे.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने एकूणच शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पेपर लीक रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. विरोधकांकडून सरकारला सातत्याने दबाव वाढवला जात असल्याने, या मुद्द्यावर लवकरच संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.