विद्यार्थ्यांना सोबत घेऊन दादा भुसेंनी स्वीकारला शिक्षण मंत्रिपदाचा पदभार
ज्यांच्याकडे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री पदाची धुरा देण्यात आली आहे, त्या दादा भुसे यांनी अद्याप आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नव्हता. आज अखेर त्यांनी नाशिकवरून 50 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मंत्रालय गाठले आणि त्यांच्यासमवेत मंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 अशा एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. तर 21 डिसेंबर रोजी खातेवाटप जाहीर करण्यात आले. मात्र, ज्यांच्याकडे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री (Minister of School Education) पदाची धुरा देण्यात आली आहे, त्या दादा भुसे (Dada Bhuse) यांनी अद्याप आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नव्हता. आज अखेर त्यांनी नाशिकवरून 50 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मंत्रालय गाठले आणि त्यांच्यासमवेत मंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी संस्था, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भुसे मंत्र्यालयात पदभार स्वीकारणार आहेत. मंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांना मुंबईला सोबत घेऊन दादा भुसे बसद्वारे मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत.
सर्वोत्तम काम करून दाखवणार
महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी नाशिकवर सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन दिले आहे. ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे, मला माहित आहे की, हे एक मोठे आव्हानात्मक काम आहे. परंतु सर्व विभाग झपाटून काम करेल. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात सर्वोत्तम काम करून दाखवण्याचा प्रयत्न करू, असे पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दादा भुसे म्हणाले.
शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार
ते पुढे म्हणाले की, शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरविणार आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले, त्यामुळे दुखवटा असल्याने मी आतापर्यंत पदभार स्वीकारला नाही. नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या 200 च्या वर आहे. स्वच्छता गृह, शाळा दुरूस्ती, ई - शाळा सुरू करणे, असे अनेक उपक्रम मी राबवणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.