TAIT परीक्षेचा निकाल आज ; आयुक्त अनुराधा ओक यांची माहिती
ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही, अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी / उमेदवारांची राहील. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकालाची वाट पाहाणाऱ्या २ लाखांहून अधिक उमेदवारांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. आज सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी टीएआयटी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध (TAIT exam results announced) करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Examination Council) देण्यात आली आहे. मात्र, ६ हजार ३१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल, असेही आयुक्त अनुराधा ओक (Commissioner Anuradha Oak) यांनी स्पष्ट केले. दरम्यान, TAIT परीक्षा घेऊन 80 दिवस झाले पण निकाल लागेना; ऑनलाईन परीक्षा घेऊन उपयोग काय ? या मथळ्या खाली एज्युवार्ताने दोन दिवसापूर्वी बातमी प्रसिध्द केली होती.त्यानंतर रविवारी कार्यालयाला सुट्टी असताना निकाल जाहीर केला जाणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले.
TAIT परीक्षा घेऊन 80 दिवस झाले,तरी निकाल लागेना; मग ऑनलाइन परीक्षेचा उपयोग काय?
या परीक्षेस एकूण २ लाख २८ हजार ८०८ परीक्षार्थीनी नोंदणी केली होती. यातील अनेक विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले होते. त्यांचा निकाल येणे बाकी होता. या विद्यार्थ्यांनी निकालानंतर एक महिन्याच्या आत गुणपत्रक सादर करावे, असे परीक्षा परिषदेने सांगितले होते. प्रत्यक्षात निकाल जाहीर झाल्यानंतरही अनेकांनी गुणपत्रक सादर केलेले नाही. त्यामुळे टेटचा निकाल लावण्यास विलंब होत होता. अखेर गुणपत्रिका सादर न केलेल्या ६ हजार ३१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आणि उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल सोमवारी जाहीर होईल, असे स्पष्ट केले.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही, अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी / उमेदवारांची राहील. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
