विद्यापीठातील 'प्रभारी राज' थांबवा; विद्यापीठ विकास मंचाची मागणी
कुलगुरू नियुक्ती व विद्यापीठाच्या अधिकारी भरतीमध्ये प्रभारी राज संपुष्टात आणावे व कालावधी समाप्त होण्यापूर्वीच प्रक्रिया पूर्ण करावी. विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुका या विलंबाने होत असून आधीचा प्राधिकरण कालावधी संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर ही प्रक्रिया सुरू करण्यात यावी व वेळेत प्राधिकरण गठीत करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
राज्यातील बहुतांश सर्वच विद्यापीठात चालणारा 'प्रभारी राज' थांबवावा, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचाने केली आहे. विद्यापीठ कायदा २०१६ सुधारणा (University Reforms Act 2016) करताना विद्यार्थी केंद्रित सकारात्मक बदलाला विद्यापीठ विकास मंचाचा (University Vikas Manch) पाठिंबा आहे तर राजकीय हस्तक्षेपाला तीव्र विरोध असल्याचे विकास मंचाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या आलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर (Committee Chairman Dr. Nitin Karmalkar) यांना भेटून याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
काळानुरूप विद्यापीठ कायद्यामध्ये आवश्यक बदल करताना विद्यार्थी केंद्रित सकारात्मक बदल करण्यात यावेत. कुलगुरू नियुक्ती व विद्यापीठाच्या अधिकारी भरतीमध्ये प्रभारी राज संपुष्टात आणावे व कालावधी समाप्त होण्यापूर्वीच प्रक्रिया पूर्ण करावी. विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुका या विलंबाने होत असून आधीचा प्राधिकरण कालावधी संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर ही प्रक्रिया सुरू करण्यात यावी व वेळेत प्राधिकरण गठीत करावे, अशी मागणी सिनेट सदस्य राहुल पाखरे , प्रा डॉ प्रशांत साठे , प्रदेशाध्यक्ष एन.डी. पाटील , प्रदेश सचिव परमेश्वर हसबे यांनी निवेदनाद्वारे डॉ. करमळकर यांच्याकडे केली.
प्राध्यापकांचा शैक्षणिक दरोडा : मोझे कॉलेजच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन; 7 दिवासात अहवाल द्या
महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणूक या तत्काळ सुरू कराव्यात . अभ्यास मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना निमंत्रितच्या ऐवजी स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करावे . विद्यापीठाच्या सर्व उपक्रमामध्ये स्पोर्ट, एनएसएस, युवा महोत्सव प्रत्येक महाविद्यालयाचा सहभाग बंधनकारक करावा. आधिसभा व व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यार्थी केंद्रित विषयाला चर्चेसाठी राखीव वेळ ठेवावा. अधिसभा बैठका वर्षात तीन वेळा घ्याव्यात किंवा दिवस वाढवा. सर्व विद्यापीठ परीक्षांच्या निकालाचे वेळापत्रक वर्षाच्या सुरवातीला घोषित करून त्याप्रमाणे वेळेत अंमलबजावणी करावी . यासह अनेक मुद्द्यांचा समावेश असलेले निवेदन विद्यापीठ विकास मंचाने समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर यांना देण्यात आले.