प्राध्यापकांचा शैक्षणिक दरोडा : मोझे कॉलेजच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन; 7 दिवासात अहवाल द्या
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तात्काळ याबाबतीत सत्यशोधन समिती घटित केली असून फक्त 7 दिवसात या समितीस आपला सत्यशोधन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वाघोली येथील पार्वतीबाई मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Parvatibai Moze Engineering College) प्राध्यापाकांनी एकप्रकारे शैक्षणिक दरोडा टाकूण त्यातून माया जमा करण्याचा उद्योग केल्याचे समोर आले.मात्र, पोलिसांनी धाड टाकून हा सर्व प्रकार उधळून लावला.त्यात आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) संबंधित महाविद्यालयात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापना केली असून विद्यापीठाला पुढील 7 दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई (Director-in-charge of Examination and Evaluation Board Dr. Prabhakar Desai) यांनी याबाबत निवेदन प्रसिध्द केले आहे.
'एज्युवार्ता'ने या संदर्भातील बातमी सर्वप्रथम प्रसिद्ध केली होती. त्यानंतर विद्यापीठाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. डॉ. प्रभाकर देसाई यांनी प्रसिध्द केलेल्या निवेदनानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे परीक्षा नियोजन, मूल्यनिर्धारण आणि परीक्षांचे निकाल सुव्यवस्थित करण्यात कटिबद्ध असून या संदर्भातील प्रत्येक कृती ही अधिनियमीत, प्रामाणिक, संवेदनशील तसेच ती नियमबद्ध व नैतिक असली पाहिजे याबाबतीत जागरूक आहे. परीक्षा नियोजन व मूल्यमापन तसेच निकाल प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांमध्ये याबाबतीत संवेदनशीलता निर्माण केली जात आहे. तरीही आज मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय, वाघोली येथील प्राध्यापकांकडून जी कृती घडली आहे ती अत्यंत अनैतिक आणि विद्यापीठ परीक्षा नियोजन नियमावलीचे उल्लंघन करणारी आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तात्काळ याबाबतीत सत्यशोधन समिती घटित केली असून फक्त 7 दिवसात या समितीस आपला सत्यशोधन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या समितीकडून अहवाल प्राप्त होताच तात्काळ परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून याबाबतीत संबंधितांवर विद्यापीठ कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची अशी घटना असून तिचे गांभीर्य आणि पावित्र्य प्रत्येकाने जपायला हवे आणि याबाबतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळ अत्यंत संवेदनशील आहे,असेही डॉ. प्रभाकर देसाई यांनी निवेदनात नमूद केले आहे.