एसएनडीटी विद्यापीठाने उच्च शिक्षणापासून वंचित महिलांपर्यंत पोहोचावे - राज्यपाल रमेश बैस

विद्यापीठाने आदिवासी  मुलींच्या शिक्षण सोडण्याची कारणे शोधून त्यांना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे,

एसएनडीटी विद्यापीठाने उच्च शिक्षणापासून वंचित महिलांपर्यंत पोहोचावे - राज्यपाल रमेश बैस

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी देशात असलेला महिला साक्षरतेचा दर ९ टक्क्यांवरून आज ७७ टक्क्यांवर आला असला तरी देखील उच्च शिक्षण प्रवाहातील महिलांचे, आणि विशेषतः आदिवासी क्षेत्रातील महिलांचे, प्रमाण बरेच कमी आहे. हे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने एसएनडीटी महिला विद्यापीठाने आदिवासी, सामाजिक - आर्थिक दृष्ट्या मागास, ड्रॉप आऊटस, अल्पसंख्यांक, दिव्यांग महिला तसेच तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या महिलांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais)यांनी केले.    

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ७३ वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू प्रा. रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय नेरकर, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.

आश्रमशाळांमधील अनेक आदिवासी मुली दहावीनंतर शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात. असे नुकत्याच घेतलेल्या एका शासकीय आढावा बैठकीत समजल्याचे नमूद करुन बैस म्हणाले,  विद्यापीठाने आदिवासी  मुलींच्या शिक्षण सोडण्याची कारणे शोधून त्यांना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे. आगामी काळात अधिकाधिक महिलांपर्यंत उच्च शिक्षण कसे नेता येईल,  या दृष्टीने विद्यापीठाने व्यावसायिक स्तरावर मार्गदर्शन घ्यावे, अशी सूचना बैस यांनी केली. तसेच विद्यापीठाने तंत्रज्ञान तसेच ऑनलाईन शिक्षणाचा वापर वाढवून महिलांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवावे,असेही त्यांनी सांगितले. 

दीक्षांत समारंभामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्य विद्या शाखा तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमधील १३७४९ विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. एकूण ४३ विद्यार्थिनींना विद्यावाचस्पती पदवी देण्यात आली तर ७१ विद्यार्थिनींना सुवर्ण पदक, एका विद्यार्थिनीला रजत पदक आणि १३३ विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.